नरेंद्र मोदी पंतप्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधानांनी २५ सप्टेंबर रोजी केलेल्या भाषणाचा साररूप अनुवाद..

मी लोकशाहीचा मूळ स्रोत मानल्या जाणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. आमच्या देशाला लोकशाहीची हजारो वर्षांची परंपरा आहे. या १५ ऑगस्ट रोजी भारताने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांमध्ये पदार्पण केले आहे. आमच्या देशामध्ये असलेले वैविध्य हीच आमच्या मजबूत लोकशाहीची ओळख आहे.

भारतामध्ये अनेक भाषा आहेत, त्यांच्या शेकडो बोलीभाषा आहेत. राहणीमान, खाणेपिणे याबाबतीत इथे वैविध्य आहे. इथली लोकशाही किती रसरशीत आहे, याचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

एक लहान मुलगा कधीकाळी रेल्वे स्थानकात असलेल्या चहाच्या ठेल्यावर आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होता, तो आज भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चौथ्यांदा भाषण करतो आहे, ही भारतामधल्या लोकशाहीची ताकद आहे.

सगळ्यात जास्त काळ गुजरात या राज्याचा मुख्यमंत्री आणि गेली सात वर्षे भारताचा पंतप्रधान या नात्याने सरकारचा प्रमुख म्हणून देशवासीयांच्या सेवेत माझी २० वर्षे पूर्ण होत आहेत.  मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे, की होय लोकशाही हे करू शकते. होय, लोकशाहीने हे केले आहे.

एकात्म मानवदर्शन या संकल्पनेचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे. एकात्म मानवदर्शन म्हणजे विकास आणि विस्ताराचा स्वत:पासून ते समष्टीपर्यंतचा सहप्रवास. स्वचा विस्तार करताना व्यक्तीपासून ते समाजापर्यंत, देशापर्यंत आणि पुढे संपूर्ण मानवजातीपर्यंत जाणे. हा विचार, हा प्रवास अंत्योदयाशी जोडलेला आहे. अंत्योदय म्हणजे एक असा प्रवास जिथे कुणालाही मागे टाकले जात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे त्यात अपेक्षित आहे. याच भावनेतून आज भारत एकात्म तसेच न्याय्यविकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सर्वव्यापी, सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी, सर्वाना फळे मिळतील अशा विकासाला आमचे प्राधान्य आहे.

आजवर बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेले ४३ कोटी लोक गेल्या सात वर्षांमध्ये भारतात या व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. आपल्याला विम्याचे कवच मिळू शकते, असा ज्यांनी आजवर कधी विचारही केला नव्हता, अशा ३६ कोटी लोकांना आजघडीला विमासुरक्षा मिळाली आहे.

भारताने मोफत उपचारांची सोय देऊन ५० कोटींहून जास्त लोकांना दर्जेदार आरोग्य सेवेशी जोडून घेतले आहे. तीन कोटी पक्की घरे बांधून आम्ही बेघर लोकांना निवारा दिला आहे.

प्रदूषित पाणी हा सगळ्याच गरीब आणि विकसनशील देशांमधला मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी भारतात १७ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याची खूप मोठी मोहीम सुरू आहे. आज ड्रोनने मॅपिंग करून आम्ही सहा लाखांहून अधिक गावांमध्ये कोटय़वधी लोकांना त्यांचे घर आणि जमिनीचे डिजिटल नोंदणी देण्याचे काम करत आहोत. त्यामुळे जमिनीच्या मालकीसंदर्भातले वाद कमी करण्याबरोबरच लोकांना कर्ज मिळण्याची सुविधा सुलभ होईल.

आज जगामधली प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे भारतीयांची प्रगती होते तेव्हा जगाच्या विकासालाही गती मिळते. भारतात होणारे विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित नवे उपक्रम जगाला खूप उपयोगी ठरू शकतात. आमच्या टेक-सोल्यूशन्सची व्याप्ती आणि त्यांची किंमत यांची जगात कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. आमच्या यूपीआयच्या (युनायटेड पेमेंट इंटरफेस) माध्यमातून दर महिन्याला ३५० कोटींहून अधिक व्यवहार होतात. को-विन या भारतामधल्या लसीकरणाच्या संदर्भातल्या अ‍ॅपवरून एकाच दिवसात कोटय़वधी लशींचे कोटय़वधी डोस देण्यासाठीची डिजिटल नोंदणी होते.

सेवा परमो धर्म: हे बिरुद जगणाऱ्या आमच्या देशाने स्वत:जवळ मर्यादित साधनसंपत्ती असूनही लस विकसित करणे आणि तिचे उत्पादन या कामात झोकून दिले आहे. मी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला ही माहिती देऊ इच्छितो की,भारताने जगामधली पहिली डीएनएवर आधारित लस विकसित केली आहे. ही लस १२ वर्षांच्या पुढच्या सर्वाना देता येईल. आणखी एक  m- RNA लस शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. भारतामधले संशोधक नाकातून घेण्याच्या एका लशीच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहेत. मानवजातीच्या संदर्भातले आपले कर्तव्य लक्षात घेऊन भारताने पुन्हा एकदा जगातल्या गरजू देशांना लसपुरवठा करायला सुरुवात केली आहे. मी आज या व्यासपीठावरून जगातल्या सगळ्या लसनिर्मात्यांनाही भारतात येऊन लसनिर्मिती करण्यासाठी आमंत्रित करतो आहे.

मानवी जीवनामधले तंत्रज्ञानाचे महत्त्व आज आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण बदलत्या जगात तंत्रज्ञान आणि लोकशाही मूल्ये एकमेकांच्या हातात हात घालून चालत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. मूळचे भारतीय असलेले डॉक्टर्स, इंजिनीअर्स व्यवस्थापक, नवनिर्माते जगातल्या इतर कोणत्याही देशात राहत असोत, भारतामधली लोकशाही मूल्ये त्यांना नेहमीच मानवजातीची सेवा करण्याची प्रेरणा देतात, हे आपण करोनाकाळातही बघितले आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आता आणखी   वैविध्य आणण्याची गरज आहे हा करोना महासाथीने जगाला धडा दिला आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय उत्पादन व्यवस्थेचा (Global Value Chains) चा विस्तार केला जाणे गरजेचे आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ ही आमची मोहीम याच भावनेने प्रेरित आहे. या मोहिमेमध्ये भारताने अर्थव्यवस्था तसेच परिस्थितिकी (Ecology) या दोन्हींमध्ये समन्वय साधला आहे. मोठय़ा तसेच विकसित देशांच्या तुलनेत हवामानबदलाच्या संदर्भातील कृती (Climate Action) संदर्भात भारताचे प्रयत्न बघून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. आज भारत अतिशय वेगाने ४५० गिगाव्ॉट रिन्यूएबल ऊर्जानिर्मितीच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला जगामधला सगळ्यात मोठा ग्रीन हायड्रोजन हब बनवण्याच्या मोहिमेमध्ये आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

प्रतिगामी विचारांचा धोका

जगाला दिशा देण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा काय करत होते, याचे आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढय़ांना उत्तर द्यायचे आहे. आज जगासमोर प्रतिगामी विचारांचा तसेच कट्टरवादाचा धोका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आपला विकास विज्ञानाधारित, तर्कनिष्ठ तसेच प्रागतिक विचारांवर आधारित असेल याचे भान सगळ्या जगानेच बाळगले पाहिजे.

विज्ञानावर आधारित दृष्टिकोन बळकट करण्यासाठी भारत अनुभवाधारित शिक्षण प्रक्रियेवर अधिक भर देतो आहे. आमच्या देशात शाळांमध्ये हजारो अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. इनक्युबेटर्स तयार केले आहेत. स्टार्टअपसाठी एक मजबूत परिसंस्था (ecosystem) विकसित झाली आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांमध्ये भारत शाळा तसेच महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ७५ उपग्रह अंतराळात पाठवणार आहे.

प्रतिगामी विचारसरणी असलेले काही देश राजकीय हत्यार म्हणून दहशतवादाचा वापर करत आहेत. त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की हाच दहशतवाद त्यांच्यासाठीदेखील तितकाच धोकादायक आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जाऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिथे असलेल्या नाजूक परिस्थितीचा कोणत्याही देशाने हत्यारासारखा वापर करण्याचा प्रयत्न करू नये यासाठीदेखील आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. आजच्या घडीला अफगाणिस्तानातील लोकांना, तिथल्या स्त्रियांना, लहान मुलांना, तिथल्या अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. त्यासंदर्भातली आपली जबाबदारी आपल्याला पार पाडलीच पाहिजे.

भारताचे थोर तत्त्वज्ञ आचार्य चाणक्यांनी फार पूर्वी म्हटले आहे की ‘कालाति क्रमात काल एव फलम् पिबति’; म्हणजे योग्य काम योग्य वेळी केले नाही तर काळच त्या कामाचे यश संपवून टाकतो. स्वत:ला कालसुसंगत ठेवायचे असेल तर संयुक्त राष्ट्राला आपली परिणामकारकता सुधारावी लागेल, आपली विश्वासार्हता वाढवावी लागेल.

आपण पाहतो आहोत की करोनाची महासाथ असो की हवामान बदलाचे संकट असो, संयुक्त राष्ट्रांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेला दहशतवाद, छुपी युद्धे, आणि आता अफगाणिस्तानच्या संकटाने हे प्रश्न अधिक ठळक केले आहेत. जागतिक व्यवस्था, जागतिक कायदे तसेच जागतिक मूल्यांच्या रक्षणासाठी आपण संयुक्त राष्ट्राला मजबूत केले पाहिजे. नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव टागोर म्हणतात चांगले काम करण्यासाठी वाटचाल सुरू करा. सगळ्या उणिवा आणि शंका आपोआप संपतील.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi speech at the united nations general assembly zws
First published on: 28-09-2021 at 01:21 IST