एखादा पराजय झाला, की सनिकाची उमेद खचते. ती जागी ठेवण्याचे काम सेनापतीलाच करावे लागते. सध्याच्या राजकारणात काही सनिकांची अवस्था सरभैर झाल्यानंतर त्यांच्या सेनापतीच्या या कौशल्याची कसोटी सुरू झाली आहे. पराभवानंतरची हतबलता पुसून परिस्थितीला सामोरे जाण्याची उमेद जागी ठेवण्यासाठी वैचारिक कसरती करण्याची वेळ सेनापतीवर येऊन पडल्याने, सन्यापेक्षाही सेनापतीच्या कौशल्याची कसोटी सुरू झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीसे असेच अस्वस्थतेचे वातावरण पसरले, तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भविष्याचा नेमका वेध घेत कार्यकर्त्यांना सावध केले होते. युतीच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, तेव्हा तुमच्यावरही कारवाई होऊ शकते, हे लक्षात घेऊन तुरुंगात जायची तयारी ठेवा, असा इशारा शरद पवार यांनी दिला, त्याला दोन आठवडे उलटण्याच्या आतच राष्ट्रवादीचा एक बिनीचा मोहरा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कोठडीत गेल्याने, उरल्यासुरल्या सेनेची उमेद खचून जाऊ नये यासाठी नवी उभारी देण्याची जबाबदारी नव्याने सेनेच्या पहिल्या फळीवर पडणार, हे ओघानेच येते. तुरुंगात जायची तयारी ठेवली पाहिजे, हा पक्षाध्यक्षांचा इशारा, त्यापाठोपाठ तुरुंगवासी झालेला पहिला नेता आणि अनेक बिनीच्या मोहऱ्यांवर दाटू लागलेले अटकेचे सावट हा पक्षाच्या सन्याची उमेद खचविणाराच प्रकार असला, तरी अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे यांनी सेनापती पदाची सूत्रे हाती घेतली हे बरे झाले. अटक झाल्यानंतर न्यायालयात स्वत:ची बाजू मांडताना भुजबळांचे डोळे पाणावले होते, ते सद्गदित झाले होते आणि ५० वर्षांच्या महाराष्ट्राच्या सेवेचे हेच फळ काय, असा हतबल सवालही त्यांनी न्यायालयासमोर केला होता. साहजिकच, ही परिस्थिती मागे राहिलेल्या आणि अगोदरच पराभवामुळे नाउमेद झालेल्या सन्याच्या मानसिकतेला उमेद देणारी नाही. त्यामुळे सुप्रियाताईंनी सूत्रे हाती घेतली हेही बरेच झाले. आम्ही मराठे आहोत, अटकेला घाबरत नाही, असा सणसणीत इशारा सत्ताधाऱ्यांना त्यांनी दिला, तेव्हा महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनतेचे रक्त नवचतन्याने सळसळू लागले असणार, यातही शंका नाही. पहिले पाऊल गजाआड टाकताना दाटून आलेले डोळे पुसून ते भुजबळदेखील नव्या उमेदीने अटकेला सामोरे जायला तयार झाले असतील यातही शंका नाही. मराठी मातीचा असा अभिमान उराउरी व्यक्त होत असताना आणि आपल्या पक्षाच्या भावी पिढीच्या नेत्याकडूनच मराठेपणाच्या अभिमानगाथेचा शौर्यरसपूर्ण उद्गार आसमंतात घुमत असताना, ‘हेचि फळ काय मम तपाला’ असले करुणरसाने भरलेले प्रश्न विचारत तुरुंगात राहणे आता पुरे झाले, असेही त्यांना निश्चितच वाटले असेल. तुरुंगात जायची तयारी ठेवा, असा सल्ला पक्षप्रमुखांनी दिल्यानंतर हसत हसत तुरुंगाची पायरी चढायचे सोडून, पहिल्याच पायरीवर अश्रू ढाळून त्यांनी मराठेशाहीच्या परंपरेला न साजेसा धक्का दिला, हेही चुकलेच होते. मागे राहिलेले सन्य आता नव्या दमाने नव्या लढाईसाठी सज्ज झाले, तर सेनापतीच्या कसोटीला नेतृत्व पुरते उतरले असे म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncomfortable atmosphere in nationalist congress party
First published on: 18-03-2016 at 03:40 IST