‘इशरत जाते जिवानिशी’ हा अग्रलेख (५ जुलै) आवडला. एखाद्या धर्मातील धर्माध लोकांबद्दल (विरोधात) कसे लिहायचे.. असला दांभिक-धर्मनिरपेक्ष प्रश्न मनात न आणता लेख लिहिला गेला आहे, हे स्पष्टपणे दिसते आहे. त्याबद्दल अभिनंदन.
हल्ली इशरत जहाँ या नावावर आणि संबंधित प्रकरणाच्या ‘एकाच बाजूवर’ इतका भर दिला जात आहे, की..बस्स! जणू संपूर्ण भारतासमोर हा एकच विषय आहे. काही वृत्तवाहिन्या इतर तीन तरुणांची नावेही घेत नाहीत. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे खरे, अत्यंत महत्त्वाचे विषय / मुद्दे (इश्यूज) मागे टाकून लोकांमध्ये फूट पाडणारे, भावना चेतवणारे मुद्दे (नॉन-इश्यूज) पुढे आणायचे.. हेच षड्यंत्र यामागे आहे. एकुणातच, ‘‘इशरत जहाँ आणि कुटुंबीय हा एक सरळ-साधा परिवार गुजरातमध्ये पर्यटनासाठी/ सहज गेला होता.. आणि गुजरातमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना शोधत फिरणाऱ्या (शस्त्रधारी) लोकांनी त्यांना गंमत म्हणून सहज मारून टाकले; गुजरातमध्ये अशा घटना वारंवार घडतच असतात.. आणि हो, मोदी आपले येता-जाता फोनवर अशा ‘विशिष्ट पर्यटकांना’ ‘टिपण्याचे’ आदेश त्या शस्त्रधारी लोकांना देत असतात..’’ असेच वातावरण निर्माण केले जात आहे.
अर्थात, ती चकमक बनावट असेल, तर त्याबद्दलची कायदेशीर शिक्षा संबंधितांना भोगावीच लागेल. पण गुन्हेगारांना शिक्षा होण्यापलीकडचेही ‘अधिक असे काहीबाही’ अनेकांना या प्रकरणातून मिळवायचे आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा गेली १० वष्रे खेळ चालू आहे. प्रसारमाध्यमे-विचारवंत-अभ्यासक असे सर्वच जण या प्रकरणाचा इतिहास विसरले होते / आहेत. तो धक्कादायक व आश्चर्यकारक इतिहास या अग्रलेखाद्वारे लोकांपुढे आला आहे. २००७  साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रानेच ही चकमक खरी होती असे नमूद केले होते.आतादेखील बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात गुप्तचर आयोगाने नऊ वर्षांपूर्वीची ती कारवाई केंद्रीय आणि राज्य सरकारी सुरक्षा यंत्रणांची संयुक्त मोहीम होती, असेच म्हटले आहे.
ही वरील माहिती खरोखरीच धक्कादायक आहे. मतांसाठीच्या लाचारीचे आणि लांगूलचालनाचे हे एक अत्युच्च उदाहरणच ठरावे.
संपादकांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेतच. इतर राज्यांमध्ये ‘बनावट चकमकी’ झाल्या नाहीत का? झाल्या असतील, तर त्या संबंधित अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे (मुख्यमंत्र्यांचे) काय झाले? इशरतसारखे कोवळे तरुण-तरुणी धर्माधतेला बळी पडून दहशतवादाकडे वळतात, हे सामाजिक अनारोग्याचेच लक्षण आहे. असे होणे दु:खदच आहे..पण उगाच खपल्या काढून, रक्त तापवून ‘..खतरे में’च्या घोषणा देऊन आपल्याला का भडकवले जात आहे; यात कोण स्वार्थ साधत आहे.. या मुद्दय़ांचा तरुणांनी गांभीर्याने विचार करायला हवा. अन्यथा, २०१९ लाही पुन्हा एखाद्या इशरत जहाँचे प्रकरण उकरले जाईल, चघळले जाईल.

पूर्ण चौकशी झाली पाहिजे
‘इशरत जाते जिवानिशी’ हे संपादकीय (५ जुल) अप्रतिम आणि राष्ट्रहितकारक आहे. इशरत आणि अन्य तीन लष्कर-ए-तोयबाच्या फिदायीन दहशतवाद्यांचे एन्काउंटर ही केंद्रीय आणि राज्य सरकारी यंत्रणांची संयुक्त मोहीम होती, हा महत्त्वाचा मुद्दा संपादकीयमध्ये अधोरेखित करून मोदींबरोबरच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि राजेंद्रकुमार यांचे वरिष्ठ के.पी.सिंग यांचेही नाव घेतले आहे हे अत्यंत योग्य आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा सहभाग चकमकीत होता हे कळल्यामुळे संबंधित प्रकरणातून राजकारण वजा होईल आणि ‘मेरिट’वर प्रकरणाचा तपास होईल. चकमक खरी होती का, याच्या तपासाबरोबरच मारले गेलेले इशरत आणि तिचे साथीदार दहशतवादी होते का, याचाही तपास करणे अत्यावश्यक आहे. मुंबईवरील २६/१च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड दाऊद सय्यद गिलानी ऊर्फ डेव्हिड हेडली या दहशतवाद्याने इशरत लष्कर-ए-तोयबाच्या आत्मघाती पथकातील शिक्षित दहशतवादी होती असे म्हटले आहे. इशरतच्या इतिहासाची सखोल चौकशी करण्याची आणि सत्याचा शोध घेण्याची गरज आहे. इशरत जावेद शेखबरोबर ज्या निळ्या रंगाच्या इंडिका कारने जात असताना गुजरातमधील आणंद जिल्ह्य़ातील वसद येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, त्या कारच्या मालकाकडून आणि ज्याने मुंबईत रजिस्टर झालेली ही कार अहमदाबादला नेली त्या ड्रायव्हरकडून इशरत आणि जावेद यांची बरीच माहिती मिळवता येईल. २००८च्या मालेगाव येथील बॉम्बस्फोटात ज्या मोटरसायकलवर बॉम्ब मिळाला त्याची एके काळची मालकीण साध्वी प्रग्यासिंग हिला अजूनही तुरुंगात ठेवले आहे. दहशतवाद्यांना इंडिका कार पुरवणाऱ्यालाही तोच न्याय द्यावा. इशरतचा मित्र जावेद शेख ज्याच्याबरोबर ती हॉटेलमध्ये पत्नी म्हणून राहिली, त्याचा पूर्वेतिहास चांगला नाही. मुंबई आणि पुणे येथे त्याच्यावर मारामारीचे चार आणि खोटय़ा नोटा बाळगल्याचा एक गुन्हा आहे. मूळच्या केरळी पिल्लाईने साजिदा नावाच्या मुलीशी विवाह करण्यासाठी १९९० मध्ये धर्मातर केले. इशरतला त्याने नाशिक, बंगलोर आणि लखनौ येथे नेले होते. या ठिकाणीच त्याला पाकिस्तानी दहशतवादी अमजाद अली राणा भेटला होता. इशरतच्या आईला ती जावेदबरोबर परगावी जात असे हे आवडत नसे, म्हणून नाशिकला जाताना इशरतने घरी सांगितले नाही आणि तेथे गेल्यावर फोन केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांशी त्याचा कसा संबंध आला याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.
केशव आचार्य

सुरक्षा की षड्यंत्र?
भारत सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे आता ६७ टक्के जनतेला माणशी रु. ३ किलो दराने ५ किलो तांदूळ तसेच गव्हासारखी इतर अन्नधान्येही बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात मिळणार आहेत. भारतात सर्वसाधारणपणे सकस आणि पुरेसा आहार घेण्यापेक्षा इतर अरबट-चरबट खाऊन राहिलेला पसा चनबाजीवर उधळण्याकडे अधिकांश समाजाची प्रवृत्ती दिसते. एखाद्या नोकराला जेऊन-खाऊन दिलेला पगार आवडत नाही; त्याऐवजी त्याला पसेच हवे असतात. भिकाऱ्यालासुद्धा पसे हवे असतात. त्यामुळे असे स्वस्तात मिळालेले अन्न कुपोषण कमी करण्यासाठी वापरले जाण्याऐवजी चढय़ा भावाने विकले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. २० किलो तांदूळ मला ३ रु.त  मिळाल्यास थोडा ठेवून इतर मी ७ रु.ला त्याच वाण्याला विकून १३३ टक्के फायदा उकळू शकतो. तोच तांदूळ वाणी ७ रु.चा १५ रु.ला विकून १०० टक्क्यांहून अधिक फायदा मिळवेल. आणि गिऱ्हाईकालाही २० रु.चा तांदूळ १५ रु.ला मिळाल्यामुळे २५ टक्केची सूट मिळेल! क्या बात है? समाजाला मूर्ख बनविण्याच्या या योजनेची किंमत आहे फक्त सव्वा लाख कोटी! ती कररूपाने मायबाप सरकार मध्यमवर्गाकडून लवकरच वसूल करील! अशा सरकारलाच आता आम आदमी राज्यावर पुन्हा बसवायला आतुर आहे!
राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

पगारवाढीसाठी परीक्षा हवी
‘शिक्षण क्षेत्राकडे शासनाचे कायम दुर्लक्ष’ (लोकमानस, ५ जुल) यातील काही मतांशी मी असहमत आहे. सहाव्या वेतन आयोगाद्वारे पगारवाढ करण्यापूर्वी सरकारने शिक्षकांची गुणवत्ता पडताळण्यासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. ज्या शिक्षकांना यात चांगले गुण मिळतील त्यांचीच पगारवाढ करावी. जे अनुत्तीर्ण होतील त्यांची पगारवाढ ते जेवढय़ा वेळेस ती परीक्षा पुन:पुन्हा देतील तेवढी कमी करावी. सरकार ज्या प्रकारे यांच्यावर आíथक खिरापत करीत आहे त्यातुलनेत शिक्षणाचा दर्जाच नाही आहे. हे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे फार मोठे दुर्दैव आहे. देशातील एका अहवालानुसार ४७ टक्के पदवीधर हे अकुशल आहेत. सध्याचे युग हे स्पध्रेचे आहे. शिक्षकास एखादी बाब येत असेल तर शिक्षक ती विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. मी माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी उपलब्ध वेळेचा कसा उपयोग करीन याचे ठोस वेळापत्रक बनवून मी त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रात दर्जात्मक आमूलाग्र बदल अशक्यप्राय आहे. कसेही शिकवले तरी आपल्याला वेतनश्रेणीप्रमाणे भरघोस पगार मिळत राहील याची १०० टक्के खात्री आज विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद करीत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना महागडय़ा खासगी शिकवण्या परवडत नाहीत. असे विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञानाच्या बाबतीत खूप आशावादी असतात. या बिकट परिस्थितीत कसा हा महाराष्ट्र आणि देश घडणार ?
जयेश राणे, भांडुप, मुंबई.

उचित गौरव व्हावा
उत्तराखंडमध्ये वायुसेनेच्या ‘ऑपरेशन राहत’ या मोहिमेचे टास्क फोर्स कमांडर एअर कमोडोर राजेश इस्सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:चे प्राण पणाला लावून अत्यंत दुर्गम ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवून हजारो मानवी जीव वाचविण्याची अतुलनीय कामगिरी बजावली. बचावमोहिमेवरील एका हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत २० धाडसी लोक आपण गमावले याचे दु:ख आहे. या मर्दाचा उचित गौरव झाला पाहिजे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  क्रिकेटपटूंनी एखादा करंडक जिंकला की हे मंडळ त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये शाबासकी म्हणून देते.  या संघटनेने प्राणदानाचे पवित्र काम करणाऱ्या वीरांचा भरघोस रक्कम देऊन गौरव करावा.
अनिल रा. तोरणे (तळेगाव दाभाडे)