अंबरनाथमध्ये २२ वर्षीय तरुणीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पीडितेचा मृतदेह बेळगावमधील निर्जनस्थळी फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन मित्रांना अटक केली आहे. निकलेश पाटील (२४) आणि अक्षय वालोदे (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.

नागपूरमधील २२ वर्षीय तरुणी मुंबईत नोकरीनिमित्त आली होती. विक्रोळीत ती एका कॉल सेंटरमध्ये कामाला होती. दोन दिवसांपूर्वी निकलेश तिला भेटण्यासाठी मुंबईत आला. निकलेशसोबत त्याचा मित्र निलेशही मुंबईत आला होता. निकलेश हा नागपूरचा असून तो पीडित तरुणीचा बालमित्र असल्याचे समजते. निकलेशने पीडितेला फिरायच्या बहाण्याने अंबरनाथमध्ये नेले. तिथून तिला अक्षय वालोदेच्या अंबरनाथमधील पालेगावमधील घरात नेले. तिथे निकलेश आणि अक्षयने तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी पोलिसांकडे तक्रार करेल या भीतीपोटी त्यांनी तिची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह बॅगेत टाकून ते कारमधून बेळगावला गेले. यादरम्यान त्यांचा मित्र निलेश हादेखील कारमध्ये होता. बॅगेत काय आहे अशी विचारणाही त्याने निकलेश आणि अक्षयकडे केली. मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. यानंतर बेळगावमध्ये निलेशचे लक्ष नसताना दोघांनी बॅग कारमधून फेकून दिली. बॅग नसल्याचे लक्षात येताच निलेशचा संशय बळावला आणि त्याने पोलिासंना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून निकलेश आणि अक्षय दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.