‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हा विजू माने यांचा चित्रपट पूर्ण असून प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत ‘गोजिरी’, ‘खेळ मांडला’, ‘शर्यत’, ‘ती रात्र’ अशा चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन-लेखन विजू माने यांनी केले असून ‘बायोस्कोप’ या गाजलेल्या चित्रपटापैकी विजू माने दिग्दर्शित ‘एक होता काऊ’ हा चित्रपट भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला आहे. त्याशिवाय ‘खेळ मांडला’ या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार माने यांना मिळाले आहेत.  ‘बूढ्ढा होगा तेरा बाप’ या नाटकाची निर्मिती-दिग्दर्शन त्यांनी केले होते.
’ आवडते मराठी चित्रपट – ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘फँड्री’,  ‘अशी ही बनवाबनवी’
’ आवडते हिंदी चित्रपट – ‘थ्री इडियट्स’, ‘रंग दे बसंती’, सत्यजित राय यांचे सगळे चित्रपट, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’
’ आवडते दिग्दर्शक – राजकुमार हिरानी, जेम्स कॅमेरून, स्टिव्हन स्पिलबर्ग, अनुराग कश्यप
’ आवडते पटकथा लेखक – मधुर भांडारकर, विक्रमादित्य मोटवाने, अभिजात जोशी
’ आवडते नाटककार – कानेटकर, विवेक बेळे, इरावती कर्णिक, गिरीश जोशी
’ आवडती नाटकं – ‘माकडाच्या हाती शँम्पेन’, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘त्या तिघांची गोष्ट’
’ आवडते अभिनेते – गुरुदत्त, बलराज सहानी, विक्रम गोखले, बोमन इराणी.
’ आवडती अभिनेत्री – मधुबाला, काजोल, दीपिका पदुकोण.
’ आवडते खाद्यपदार्थ – खेकडा करी आणि भाकरी
’ आवडतं शॉपिंगचं ठिकाण – विव्हियाना मॉलमधील  ‘झारा’ आणि  ‘लाइफस्टाइल’ ही दुकाने.
’ आवडतेफूडजॉइण्ट्स – चरईमध्ये ‘बबनचा वडापाव’
’ आवडते हॉटेल/ रेस्टॉरण्ट –  ‘पुरेपूर कोल्हापूर’, ‘दर्यासागर’, ‘मेतकूट’
’ ठाणे शहराबाबतची संस्मरणीय आणि उल्लेखनीय गोष्ट – छोटंसं ठाणे शहर विस्तारत गेलं, घोडबंदपर्यंत वाढलं याचा अनेकांना आनंद होण्याऐवजी वैषम्य वाटतं. त्यापेक्षा मला असं वाटतं कोणतंही गाव, शहर विस्तारणं, त्याच्या रूपात, आकारमानात बदल होणं हे स्वाभाविक असतं. ठाणे शहरात झालेले बदल जुन्या ठाणेकरांनी स्वीकारले पाहिजेत. पुणे-मुंबई शहरांमध्ये कामाच्या निमित्ताने सतत ये-जा करत असल्यामुळे त्या तुलनेत ठाणे शहराची मराठमोळी ओळख, ठाण्याचं समृद्ध सांस्कृतिक वातावरण, सामाजिक संस्थांची कामे हे सगळं इतक्या उत्तम प्रकारे सुरू आहे हे जाणवतं. सांस्कृतिक वातावरणाला अद्याप कॉस्मोपॉलिटन संस्कृतीने गिळून टाकलेलं नाही हेही खूप महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक वातावरण पूर्वीसारखंच आजही आहे. त्यामुळेच अनेक कलावंत, चित्रकार, माझ्यासारखे चित्रपट कलावंत ठाण्यात राहणे पसंत करतात. एका मोठय़ा दिग्दर्शकाने जो मूळचा ठाण्याचा रहिवासी होता त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी एकदा सांगितले होते की, ठाणे सोडल्याशिवाय मोठं चांगलं करिअर तुला करता येणार नाही. बस्स. मी ठरवलं की ज्या ठाण्यात मी लहानपणापासून वाढलो, भटकलो, तिथे राहूनच मी माझं करिअर घडविणार आणि हे मी करून दाखवलं. ‘खेळ मांडला’ या माझ्या पुरस्कार विजेत्या सिनेमाचा मुहूर्तही मी ठाण्यातीलच एस. टी. वर्कशॉपमध्ये पहिला शॉट चित्रित करून केला. ठाण्याच्या बाबतीत आज महत्त्वाचे आणि प्रकर्षांने नमूद करावेसे वाटते ते म्हणजे ठाणे शहर हे स्वयंपूर्ण आहे. शाळा-कॉलेज- पायाभूत सुविधा, उद्योग, लाइफस्टाइलशी निगडित एका नागरिकाला आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा आहेत. येऊर-उपवन, मानपाडा, चेना क्रीकसारखे निसर्गसुंदर परिसर तर आहेतच. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तलावांचे शहर ही ओळख आहे, खाडीकिनारा व्यापक आहे. असे असूनही ठाणे जलपर्यटन, जलक्रीडा, अम्यूझमेंट पार्क या दृष्टीने विकसित करून पर्यटनाचे उत्तम ठिकाण म्हणून विकसित करण्याची गरज आहे. सिंगापूरसारख्या एका शहराएवढय़ा देशात जे शक्य आहे ते ठाण्याला नैसर्गिकरीत्या लाभलेल्या खाडीकिनाऱ्यावर करणेही शक्य आहे. फक्त त्यासाठी थोडी राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर ठाणे हे सिंगापूरसारखे जलपर्यटन, पर्यटनाचे शहर करणे नक्कीच शक्य आहे.