पालघरमध्ये बर्ड फ्लू शिरकाव झाला असून, पालघर शहरातील सूर्या कॉलनी जवळ असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील संशयास्पद मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या कोबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूची लागण झाल्याने झाल्याचं स्पष्ट झाले आहे. अचानक या कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली होती. मात्र आता बर्ड फ्लू असल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पालघर शहरात असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रात लागोपाठ कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तीन दिवसांत ४५ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे त्यांचे अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. हे अहवाल सकारात्मक आले असून, या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. पालघरमधील या कुक्कुटपालन केंद्रात ५५० हून अधिक कोंबड्या असून, आता हे अहवाल सकारात्मक आल्यामुळे कुकूटपालन केंद्रातील इतर जिवंत कोंबड्यांची नियमानुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

बर्ड फ्लू हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुकूटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.