वसईमधील समुद्रकिनारी मद्यपाटर्य़ामध्ये वाढ; हुल्लडबाजीचा स्थानिकांना त्रास वसईतील रिसॉर्टमध्ये मद्यपानाला बंदी घालण्यात आली आहे, मात्र समुद्रकिनारी उघडय़ावर मद्यपान करणाऱ्यांवर बंदी कधी येणार, असा सवाल आता स्थानिक रहिवासी विचारू लागले आहेत. कारण वसई-विरारमधील समुद्रकिनाऱ्यांवर सर्रास मद्यपाटर्य़ा सुरू असतात आणि याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मद्यपानामुळे समुद्रकिनारे अस्वच्छ होत असून मद्यपींच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टमध्ये मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असतात. रिसॉर्टमध्ये मद्यपान करत असल्याने दुर्घटना घडतात तसेच इतर पर्यटकांना त्रास होत असतो. त्यामुळे नुकतीच सर्व रिसॉर्टचालकांनी रिसॉर्टमध्ये मद्यपानास बंदी घातली आहे. रिसॉर्टमध्ये मद्यपानास बंदी असल्याने मद्यपींनी आपला मोर्चा किनाऱ्यावर वळवला आहे. राजोडी, कळंब, अर्नाळा, सुरूची बाग, रानगाव अशा समुद्रकिनाऱ्यांवर नेहमीच मद्यपींचे टोळके मद्यपान करताना दिसते. त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर मद्यपान चालते आणि त्यांच्या हुल्लडबाजीचा त्रास स्थानिकांना होत आहे. महिलांना त्यांचा सर्वाधिक त्रास होतो, असे कळंब येथील स्थानिक आनंद घरत यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांची वानवा सार्वजनिकस्थळी मद्यप्राशन करणे बेकायदा आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाकडे अशा मद्यपींना रोखण्यासाठी मनुष्यबळ नसल्याची माहिती पुढे आली आहे. मद्यपींच्या टोळक्यात अनेक जण असतात. आमच्याकडे वाहने व कर्मचारी यांची कमतरता आहे. त्यामुळे आम्हाला कारवाई करण्यात अडचणी येतात, अशी कबुली एका अधिकाऱ्याने दिली. आमचे भरारी पथक कारवाई करत असल्याचा दावाही त्याने केला. कारवाईची मागणी मद्यपानामुळे किनाऱ्यांवर बाटल्यांचा खच पडलेला असतो, शिवाय कचराही जमा झालेला असतो. रिसॉर्ट पोलीस आणि राज्य उत्पादक शुल्क विभागाने कडक कारवाई करून किनाऱ्यावर मद्यपान करण्यास बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वेळोवेळी गस्त घालून मद्यपींवर कारवाई करतो. शनिवार, रविवारी नाकाबंदी करण्यात येते. मद्यपींवर दामिनी पथकाकडूनही कारवाई करण्यात येते. - के. डी. कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे