पाण्याचा विसर्ग सुरू; सूर्या नदीला पूर कासा : जिल्ह्य़ात संततधार पावसामुळे कासाजवळील धामणी धरण १०० टक्के भरल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. धामणी धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्य़ातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. धामणी धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर इतकी आहे. धरणातील पाणीसाठा २८५.३१० दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणांतून नऊ हजार ६६ क्यूसेक्स पाणी सोडले आहे, तर त्याखालील कवडास धरण हे महिनाभरापूर्वीच पूर्ण भरले आहे. त्यामुळे एकूण १३ हजार ८०० क्यूसेक्स पाण्याचा निसर्ग सूर्या नदीत होत असून सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धरण पूर्ण भरल्याने पालघर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात सोमवारी ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या भागात आजवर २,२९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.