नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि वसई-विरार शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या ‘सीरियल रेपिस्ट’ला अखेर मीरा रोड येथून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. दोन वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला तुळिंज पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळेच अटक करता आली. त्याच्या अटकेनंतर वसईतील पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून त्याला फाशी देण्याची मागणी समाजमाध्यमावर करण्यात येत आहे.

रेहमत कुरेशी या विकृत तरुणाने गेल्या दोन वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील मुलींवर बलात्कार केले. १४ सप्टेंबरपासून त्याने नालासोपाऱ्यात तीन मुलींवर बलात्कार केले होते. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण होते. त्याला पकडण्यासाठी अधीक्षक गौरव सिंग यांनी विशेष पथके स्थापन केली होती. नालासोपारामधील तुळिंज पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे, डम्प डाटा काढून त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला होता आणि तो मीरा रोड येथे असल्याचे शोधून काढले होते. परंतु बुधवारी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. आम्ही सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपी रेहमत वसई रेल्वे स्थानकात आणि त्यानंतर तो मीरा रोडला उतरल्याचे शोधले होते. त्याचा डम्प डेटा काढून मोबाइल क्रमांक मिळवला होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक  विजयकांत सागर यांनी दिली. हीच माहिती उपयुक्त ठरली आणि तो पकडला गेला, असे त्यांनी सांगितले.

इतर शहरातले पोलीस जे काम दोन वर्षांत करू शकले नाही, ते काम वसईतील पोलिसांनी दोन आठवडय़ांत करून दाखवले आहे. यामुळे वसईतील पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या विकृताच्या अटकेची बातमी येताच समाजमाध्यमावर आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या विकृताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वसईकरांनी समाजमाध्यमांवर केली आहे.