शहरी भागाची भाजीगरज भागवण्यासाठी ग्रामीण पट्टय़ातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन ऋषीकेश मुळे, ठाणे नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांतून होणाऱ्या आयातीवर कृषी मालाचे गणित मांडणाऱ्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरी पट्टय़ाला यापुढे ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून अधिकाधिक ताजी भाजी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. कृषी विभागाने येत्या वर्षांत भाजीपाला क्षेत्र विस्तार मोहीम आखली असून शेतकऱ्यांना पालेभाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या अखत्यारीत ठाणे जिल्ह्य़ातील बराचसा भाग येत असून या भागात विविध विकासकामे होत आहेत. ठाण्यातील घोडबंदर, भिवंडीतील काल्हेर कशेळी, शिळफाटा, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या भागांत अनेक नव्या लोकवसाहती उभ्या राहत असून त्यामुळे लोकसंख्याही लाखांनी वाढत आहे. येथील नागरिकांना रोजच्या आहारातील भाजीपाल्यासाठी नाशिक आणि पुणे तसेच राज्यातील इतर जिल्ह्य़ांवर अवलंबून राहावे लागते. वाशी आणि कल्याण या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून मुंबई आणि ठाण्याला भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. दररोज नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांच्या ग्रामीण भागातून या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ७०० ते ८०० गाडय़ा दाखल होत असतात. तरथेट शहरात विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाला वाहून आणणाऱ्या गाडय़ांची संख्या ३० ते ३५ इतकी असते. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील वाढती लोकवसाहत लक्षात घेऊन आणि नाशिक आणि पुणे तसेच राज्यातील अन्य जिल्ह्य़ातून होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकीवर अवलंबून राहण्याऐवजी पर्याय म्हणून ठाणे जिल्हा कृषी विभागाने भाजीपाला क्षेत्राचा विस्तार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत. या मोहिमेतील निर्यातक्षम भाजीपाला क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत भेंडी, ढोबळी मिरची, वांगे आणि टोमॅटो या पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र वाढविण्याचे जिल्हा कृषी विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच या भाजीपाल्यासह मेथी, शेपू, पालक या भाज्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे घेण्यासाठीही पुढीला काळात प्रयत्न करणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. हा भाजीपाला जिल्ह्य़ातील शहरी भागाला पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हा कृषी विभाग अधिक्षक अंकुश माने यांनी सांगितले. सद्या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात शेती लागवडीखालील क्षेत्र ६५ हजार हेक्टर असून यामध्ये भात लागवडीखालील क्षेत्र ५० हजार हेक्टर इतके आहे. निर्यातक्षम भाजीपाला क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला क्षेत्र विस्तार मोहीम हाती घेण्यात आली असून ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला पीक घ्यावे यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. - अंकुश माने, ठाणे जिल्हा कृषी अधिक्षक