अंबरनाथमधील गैरप्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष औद्योगिकवसाहतीतील दोन कंपन्यांच्या मधून वाहणाऱ्या नाल्यात चक्क गावठी दारू तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण बदलापूर महामार्गाशेजारी आयुध निर्माण संस्थेच्या समोरील बाजूने वाहणाऱ्या नाल्यातील झुडपांमध्ये हा प्रकार सुरू असून हजारो लिटर दारू येथून तयार करून विक्री केली जाते आहे. मात्र पोलीस, उत्पादन शुल्क विभागाला याबाबत माहिती नसल्याने हा धंदा जोरात सुरू असून यात काही कंपन्यांचेही सहकार्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेकायदेशीररीत्या रसायने उघडय़ावर सोडणे, रासायनिक कचरा धरण क्षेत्रात टाकणे यामुळे अंबरनाथमधील औद्योगिक वसाहत नेहमीच चर्चेत असते. त्यातच आता बेकायदा हातभट्टीची भर पडली आहे. येथील आयुध निर्माण संस्थेसमोरील काही कंपन्यांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे काही अधिकारी सोमवारी पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना नाल्यात गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. येथील सी-५ या भूखंडावर असलेल्या कंपनीच्या संरक्षक भिंतीला लागून नाला वाहतो. या नाल्याच्या पात्रात मातीचा ढिगारा रचत त्यावर एक मंच तयार करण्यात आला होता. त्या मंचावर एक मोठी शेगडी तयार करण्यात आली होती. त्यावर ठेवलेल्या मोठय़ा पात्रावर गावठी दारू तयार करण्यात येत होती. तसेच वाहणाऱ्या नाल्यात शेकडो ड्रम ठेवण्यात आले होते. त्यातही तयार दारू ठेवण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांना पाहताच तेथील एक कामगार पळून गेला. सी-५ या भूखंडाला लागून असलेल्या या नाल्यात हा प्रकार सुरू असताना कंपनीने याबाबत तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झुडपांचा आसरा घेत आतल्या बाजूस सुरू असलेल्या या दारूची ने-आण करण्यासाठी नाल्यातून कोणताही मार्ग नाही. त्यामुळे यात सहकार्य कोण करीत असेल, असाही प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीतील उपस्थित व्यवस्थापकाला एमपीसीबी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी जाब विचारला असता, याची दीड वर्षांपूर्वी तक्रार केली होती, त्या वेळी हे बंद झाले होते. मात्र पुन्हा नव्याने हे सुरू झाले आहे, असे उत्तर त्याने दिले. याबाबत सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांना विचारले असता, या संदर्भात एमपीसीबी किंवा एमआयडीसीने तक्रार केल्यास कारवाई केली जाईल, असे उत्तर त्यांनी त्यांनी दिले. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ए. बी. पाटील यांनी ‘आमच्याकडे आज मनुष्यबळ कमी आहे. उद्या कारवाई केली जाईल,’ असे ठोकळेबाज उत्तर दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे मंचक जाधव यांनी याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार असल्याचे सांगितले.