करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कळवा आणि मुंब्रा परिसर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे टाळेबंद करण्यात आले असतानाही याठिकाणी अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अशा नागरिकांना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने आता इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेतला असून त्यानुसार या दोन्ही भागांतील करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही भागांतील सर्वच इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्याची सूचना इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील खारकर आळी भागातील घाऊक धान्य बाजारपेठेतील शंभर व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावून सामाजिक अंतराचा नियम पाळण्याच्या सूचना केल्या असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३३ करोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी २१ रुग्ण कळवा-मुंब्रा भागातील आहेत. त्यामुळे या भागातील करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी हे दोन्ही परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्यात आले. औषधालये वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. या पाश्र्वभूमीवर स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सकाळी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये कळवा आणि मुंब्रा परिसरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांचे परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले. त्यामध्ये कळव्यातील १२ तर मुंब्य्रातील ३८ इमारतींचा समावेश आहे. कुलूप बंद इमारतीमधील रहिवाशांना शक्य तितके साहित्य घरपोच देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले.

ठाण्यातील घाऊक व्यापाऱ्यांना नोटिसा

ठाणे शहरातील सर्वात मोठी घाऊक धान्य बाजारपेठ खारकर आळी परिसरात आहे. येथूनच शहरातील किरकोळ विक्रेते धान्यसाठा घेऊन त्याची परिसरात विक्री करतात. तर अनेक नागरिक घाऊक दरात धान्य मिळत असल्याने येथे खरेदीसाठी येतात. या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे नागरिक सामाजिक अंतराचा नियम पाळत नसून दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहे, अशी बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे.  या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खारकर आळीतील शंभर घाऊक विक्रेत्यांना शुक्रवारी नोटिसा बजावून सामाजिक अंतराचा नियम पाळण्याची सूचना केली आहे.