महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढण्याचे तसेच महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे. अनेकवेळा महिलांना तात्काळ मदत मिळू न शकल्यानेही त्यांच्यावर अत्याचार झाले असल्याची प्रकरणे झाली आहेत. मात्र आता महिलांना एका फोनवर तात्काळ मदत मिळण्याची सुविधा मीरा-भाईंदर पोलिसांनी उपलब्ध केली आहे. महिलांच्या मदतीला धावून जाणारे महिला पोलिसांचे निर्भया हे विशेष सुरक्षा पथक मंगळवारपासून मीरा-भाईंदरमध्ये कार्यान्वित झाले आहे. वसई-विरार शहरात यापूर्वीच हे पथक कार्यान्वित आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून महाविद्यालये, मंडई, बसस्थानक तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी तरुणींची छेड काढली जाते. अनेकवेळा महिलांवर घरातच अत्याचार करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा वेळी मदत कोणाकडे मागायची, असा प्रश्न महिलांना पडत असतो. यासाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. या पथकात एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि इतर महिला पोलीस कर्मचारी असतील. या पथकाला देण्यात आलेल्या वाहनाची चालकही महिला पोलीसच आहे हे वैशिष्टय़. पोलीस कर्मचारी कमी असल्याने सध्या सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत निर्भया पथक संपूर्ण मीरा-भाईंदर शहरात गस्त घालणार आहे. पुरेसे महिला कर्मचारी उपलब्ध झाल्यावर हे पथक २४ तास सुरू राहाणार असून पथकाच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. लवकरच टोल फ्री क्रमांक या पथकाशी सहज संपर्क साधता यावा यासाठी लवकरच एक टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार असून निर्भया पथकाच्या वाहनावर तो ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने लिहिण्यात येणार आहे. हा क्रमांक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडे असणार आहे. पथकाला एखादी तक्रार मिळाल्यानंतर हे पथक कारवाई करून त्याबाबतचा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करणार आहे.