मुंबईच्या जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वसई, विरार, साफळे, बोईसर, डहाणू, बोर्डी या भागांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे येथील सखल भागात पाणी साचले आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील लांब पल्ल्याच्या लोकल उशिराने धावत असल्या तरी उपनगरीय लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.

पालघरमधून वाहणाऱ्या वैतरणा आणि सूर्या या प्रमुख नद्यांची पातळी वाढली आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे ७० सेमीने उघडण्यात आले आहेत. सूर्या नदीमधून या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेला स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे. रात्री स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क आणि ओसवाल नगरीचा रस्ता पाण्याखाली गेला होता. अजूनही हे पाणी ओसरलेलं नाही. वसई, नालासोपारा भागातील सखल भागात पाणी साचलं आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. तर अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस चांगलाच वाढला आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.