ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने ठाणे, मुंबई तसेच आसपासच्या शहरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील विहिरी तसेच कूपनलिका, असे जुने जलसाठे पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार शहरातील विहिरींची साफसफाई आणि कूपनलिका दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे ठाणेकरांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून, त्यांना पाणी कपातीची झळ सोसावी लागणार नाही. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती असून, त्या भागात महापालिकेमार्फत पाण्याचे वितरण करण्यात येते. मात्र यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणारी जिल्ह्य़ातील धरणे शंभर टक्केभरलेली नाहीत. तसेच पावसानेही गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे पुढील जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतक्या पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी पाणी कपातीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी कपातीची झळ बसू नये, म्हणून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणीसाठय़ाची परिस्थिती लक्षात घेऊन विहिरी तसेच कूपनलिका असे जुने जलसाठे पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतील वेगवेगळ्या भागात एकूण ८१३ कूपनलिका आणि ५५५ विहिरी आहेत. शहरीकरण व कारखान्यामुळे कूपनलिकेचे पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, परंतु हे पाणी अन्य कामांसाठी वापरात येऊ शकते. त्यामुळे बंद अवस्थेत पडलेल्या कूपनलिका दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विहिरींची दुरवस्था झाली असून त्यामध्ये कचरा साचला आहे. त्यामुळे या विहिरींची साफसफाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विहिरीतील पाणी पिण्याकरिता वापरात येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येते आहे. त्यासाठी विहिरीतील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे काम महापालिकेमार्फत सुरू आहे. एकंदरीतच ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये आणि त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.