सावकरनगर भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची संरक्षण भिंत अधिक भक्कम मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे शहराला विभागणाऱ्या संरक्षण भिंत अधिक भक्कम उभारण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. मानवी अतिक्रमण आणि नैसर्गिक आपत्तींना संरक्षण भिंत सक्षमपणे तोंड देईल, या दृष्टीने भिंत बांधणीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. सावरकरनगर येथील म्हाडा वसाहतीतील विश्वकर्मा व साईश्रद्धा या सोसायटीच्या आवारात पडलेल्या संरक्षण इमारत बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात हे बदल होणार आहेत. ४२ मीटर लांबीची भिंत या भागात उभारण्यात येणार असून तिची उंची ७ मीटर इतकी असणार आहे. त्यापैकी ५ मीटर उंचीचा भक्कम पाया उभारण्यात येणार असून त्यावर दोन मीटर उंचीची आणखी भिंत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या काळातही ही भिंत तग धरू शकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाण्याकडील भागाकडे वनविभागाचे प्रचंड मोठे दुर्लक्ष असून या भागातील संरक्षण भिंत वनांचे आणि वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात कुचकामी ठरत आहे. अखेर या तांत्रिक त्रुटी पूर्ण होऊन या संरक्षण भिंतीच्या काम सुरु झाले आहे. संरक्षण भिंत अशी असेल .. नव्याने बांधण्यात येणारी संरक्षण भिंत अधिक भक्कम तसेच उंच असल्याने वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टळू शकेल. त्यासाठी भिंतीचा पाया अधिक भक्कम बांधण्यात येणार असून त्यावर कचरा, पाणी आणि मातीचा भारही सहज पेलवण्यात येईल. ही भिंत पाच मीटर उंचीची असेल, तर त्यावर दोन मीटरची अशी सात मीटर उंचीची आणि ४२ मीटर लांबीची ही संरक्षण भिंत अधिक भक्कम असल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. या भिंतीच्या कामासाठी १६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा वन विभागाने हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून पुढील सहा महिन्यांच्या आत ही भिंत बांधून पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. एस. मुरुडकर यांनी दिली. समन्वयाचा अभाव ठिकठिकाणी भिंती कोसळणे, भिंतीला मोठे भगदाड पडणे, भिंत खचणे असे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे ही संरक्षक भिंत असून त्याचा उपयोग होत नव्हता. परिसरातील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भिंतीवर ताण येऊन भिंत खचून जात आहेत. गेल्या पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे तेथील भिंत ढासळल्याने सावरकरनगर येथील म्हाडाच्या नागरिक वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांपासून धोका निर्माण झाला होता. या संदर्भात स्थानिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता, मात्र वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहत यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम अडकून पडले होते.