जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन शासनाने राज्यात १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठरविले असून या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्य़ात १० लाख वृक्षांचे रोपण करण्याचे लक्ष्य देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील वृक्ष लागवडीचे हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी केले. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी या मुख्य उपक्रमाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्ह्य़ातील गावे आणि शहरांत वृक्षारोपण केले जाणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांच्या मदतीने शहरात एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमावेळी गावागावांमध्ये वृक्षदिंडींचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात त्या भागातील, आमदार, नगरसेवक, सरपंच व स्थानिक लोकनेते उपस्थित राहतील. जिल्ह्य़ातील वृक्ष लागवडीचे लक्ष्य कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी लोकांचा जास्तीत जास्त सहभाग महत्त्वाचा असून त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. नागरिकांनी सामाजिक संस्थांच्या बरोबरीने सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कल्याणकर यांनी बुधवारी ठाण्यात केले. माजिवडा उद्यानात वृक्षारोपण.. ठाण्यातील माजिवडा येथील कळवा खाडीलगत असलेल्या ५.६८ हेक्टर जागेत जैवविविधता उद्यान विकसित करण्यात येत आहे. या पडीक क्षेत्रातील जैवविविधता व निसर्ग संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा सामाजिक वनीकरण विभागास उपलब्ध करून दिली आहे. या क्षेत्रावर सामाजिक वनीकरण ठाणे विभाग स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान निर्माण करीत आहे. पुढील तीन वर्षांत येथे विविध वनांची निर्मिती, सागरतटीय वृक्षांची लागवड, निसर्ग माहिती केंद्र, वाचनालय, ध्यानधारणा केंद्र, बालोद्यान अशी कामे होणार आहेत. या उद्यानातही रोप लागवड केली जाणार आहे. ठाणे विभागात १० हजार वृक्षांची लागवडठाणे जिल्ह्य़ातील भादाणे, बळेगांव, काचकोळी, डेहणोली, धसई, झाडघार, फांगणे, शेलारी, सासणे, न्हावे, एकलहरे, तळेगांव, आंबेळे, खुटल, मेरधी आणि खांडपे तसेच भिवंडी तालुक्यातील देवचोळे, आखिवली, कोशिंबे, कल्याण तालुक्यातील आपटी, अंबरनाथमधील जावसई, पाचोन, रहटोळी, शहापुरातील बाबरे, खराडा, चोंढा (खु.), शेरा, आंबेखोर, चरीव, वाफे, कळंबे या गावांमध्ये १० हजारांच्या वर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.