गॅस सिलिंडर अनुदान बंद झाल्याने लाभार्थ्यांचे हाल लोकसत्ता, प्रतिनिधी विरार : शासनाच्या उज्ज्वला घरगुती गॅस योजनेकडे आता गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने पाठ फिरवत आहेत. पर्याय म्हूणन पुन्हा खेडय़ापाडय़ात लाभार्थी चुलीकडे वळत आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने गॅस सिलिंडर भरून घेणाऱ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. त्यात एप्रिल महिन्याप्सून शासनाने गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद केल्याने झपाटय़ाने गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. वसई तहसील विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वसई- विरारमध्ये ‘भारत गॅस’ आणि ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ या दोन कंपन्याकडून गॅस सिलिंडर वितरीत केले जातात. दोन्ही वितरक मिळून वसई तालुक्यात ५ हजार ६४० लाभार्थी उज्वला योजनेचा लाभ घेत आहेत. यात ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या अधिक आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्ये दारिद्रय़ रेषेखालील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी उज्ज्वला योजनेतून गॅस वाटप करण्यात आले होते. तसेच गॅस सिलिंडर वर शासनाने अनुदान दिले होते यामुळे लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. पण मागील दोन वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडर पुन्हा पुन्हा घेणे शक्य नसल्याने अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. वसईच्या पूर्व पट्टीत मोठय़ा प्रमाणात आदिवासी पाडे आणि ग्रामीण वस्त्या आहेत. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी आपल्या घरात गॅस लावला होता. पण मागच्या वर्षी करोना महामारीने आर्थिक मंदी आल्याने शासनाने ३ महिने या योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिने गॅस सिलिंडर मोफत दिले होते. पण याची माहिती ग्रामीण भागात पोहचली नसल्याने मोफत सिलिंडर घेण्यासाठीसुद्धा कोणी आले नसल्याचे वितरक अधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी सांगितले. श्रीवास्तव यांनी माहिती दिली की, मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून या योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा सिलिंडर घेतले नाही. उज्ज्वला योजनेचे लाभार्थी गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्याने आणि शासनाचे गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी पुन्हा गॅस घेतले नसल्याची माहिती मिळाली आहे. यात किती जणांनी घेतले नाहीत याची माहिती उपलब्ध नाही, पण लवकरच माहिती घेतली जाईल. - रोहन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई विरार पारोळ येथील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी मंगला पाणथले यांनी सांगितले की, गॅसचे दर इतके वाढले आहेत की, तेवढय़ा पैशात महिनाभराचे राशन येईल. यामुळे आता त्या गॅसऐवजी चुलीचा वापर करत आहेत.