गेल्या काही वर्षांतील २९२३ ग्राहकांची प्रकरणे अद्याप प्रलंबित

ग्राहकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ असलेल्या ठाणे जिल्हा ग्राहक मंचात गेल्या वर्षभरात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण चक्क कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा ग्राहक मंचात डिसेंबर २०१६ पर्यंत एकूण ९०५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २०१५ साली हा आकडा १,१६५ इतका होता. वर्षभरात हा आकडा घटल्याने आश्चर्य व्यक्त होत असून मागील काही वर्षांत जिल्हा मंचात तक्रार दाखल केलेले २९२३ ग्राहक अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

२०१५ आणि २०१६ दोन्ही वर्षांत १०७४ तक्रारींचा निकाल ग्राहक मंचातर्फे लावण्यात आला आहे. मात्र अजूनही २,९२३ ग्राहक न्यायासाठी वाट बघत असून २०१७ सालात तरी न्याय मिळेल याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अधिकाधिक ग्राहकांनी आपल्या तक्रारी घेऊन मंचाकडे यावे यासाठी राज्य सरकारकडूनही वेगवेगळे अभियान राबविले जात असते. मात्र एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे ठाणे ग्राहक मंचातर्फे सांगण्यात आले. अजूनही या मंचाला तक्रारदार ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र असून या क्षेत्रातील तज्ञांकडून त्याविषयी चिंतेचा सूर व्यक्त केला जात आहे.

ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तक्रार लवकर सोडविण्यासाठी ग्राहक मंच तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली. २०१५ साली ३०८५ तक्रारदार न्यायासाठी वाट बघत होते. ही संख्या २०१६ साली २९२३ पर्यत कमी झाली आहे. यावर्षी काही राष्ट्रीय बँका, बांधकाम व्यावासायिक, सरकारी कार्यालये, व्यापाऱ्यांना ग्राहक मंचाचा दणका बसला आहे. गेल्या वर्षी १०७४ तक्रारी निकालात निघाल्या असून ठाणे ग्राहक मंच मोठय़ा जागेत स्थलांतरित झाल्यास हा आकडा निश्चितच वाढू शकतो, असा दावा ठाणे जिल्हा ग्राहक मंचाचे प्रबंधक विलास पवार यांनी केला.

बिल्डरांविरोधातील तक्रारी जास्त

गेल्या काही वर्षांत बिस्किटाच्या पुडय़ात कमी वजनाची बिस्किटे भरून ग्राहकांची दिशाभूल करण्यापासून ते महागडे फ्लॅट विकत घेताना फसवणूक होत असल्याच्या विविध स्वरूपातील तक्रारी मंचाकडे दाखल होत आहेत. दरम्यान, मंचाकडे तक्रारी दाखल करून प्रत्यक्ष सुनावणीसाठी तक्रारदार उपस्थित राहत नसल्याचा अनुभव ठाणे जिल्हा ग्राहक मंचातील सूत्रांनी सांगितला. या वर्षी बांधकाम व्यावसायिकांविरोधात तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात होते. परंतु २०१६ मध्ये तक्रार नोंदविण्याचे प्रमाण २०१५ च्या तुलनेत एकंदरीतच रोडवले असल्याचे दिसून येत आहे.

ग्राहक मंचाकडे सादर होणाऱ्या तक्रारींचा आकडा दरवर्षी कमी अधिक होत असतो. एखाद्या व्यावसायिकाविरोधात अनेकदा बऱ्याच तक्रार दाखल होत असतात. अशा वेळी ती एकच तक्रार म्हणून ग्राह्य़ धरली जाते. खरे तर ग्राहक मंचाकडे अधिकाधिक तक्रारी दाखल व्हाव्यात यासाठी विविध ग्राहक संघटनांमार्फत आमचा प्रयत्न सुरू आहे.

– विलास पवार, प्रबंध ग्राहक मंच.

ग्राहक मंचाची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. त्यामुळे अनेकदा ठकविले गेलेले ग्राहक या मंचांकडे तक्रार करण्यास धजावत नाहीत. ही प्रक्रिया अधिक सोपी केली तर ‘जागो ग्राहक जागो’ अशी जाहिरात करायची कदाचित गरजही पडणार नाही.

– गजानन पाटील, कार्यक्रम अधिकारी, ठाणे ग्राहक संघटना