‘स्वच्छ, सुंदर, हरित पथांचे आधुनिक ठाणे’ असे गोडवे गायले जात असले तरी शहराचा खरा चेहरा हा असा आहे. गेल्याच महिन्यात महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील या महत्त्वाच्या महानगरातील तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रहिवासी अनधिकृत वस्त्यांमध्ये राहतात. या वस्त्या केवळ बेकायदाच नाहीत, तर धोकादायकही आहेत. खाडीकिनारी भराव टाकून, डोंगरमाथ्यावर अगदी दाटीवाटीने उभारलेल्या या घरांमध्ये राहणारी लाखो माणसे डोक्यावर भीतीची टांगती तलवार घेऊनच जगत आहेत. साऱ्या सृष्टीसाठी जीवनदायी ठरणारा पावसाळा येथील रहिवाशांसाठी कर्दनकाळ ठरतो. पावसाळ्यात यापैकी काही इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. त्याच्या ढिगाराखाली सापडून कैक लोक मृत्युमुखी पडतात तसेच जखमीही होतात. मात्र अशा रीतीने मृत्यूच्या दारात जगण्याची जोखीम पत्करलेल्या या रहिवाशांची करुण कहाणी मागच्या पानावरून पुढे सुरूच राहते. छाया-गणेश जाधव