ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे होणाऱ्या प्रदुषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेनंतर एमएमआरडीएने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यानुसार, मुल्लाबागऐवजी सत्यशंकर संकुलाच्या भिंतीपर्यंत नेण्यात येणार आहे तर, धूळ, ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एमएमआरडीएने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना काहीसा मिळाला आहे.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाला ठाण्यातील घोडबंदर येथील पाच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला होता. या कामामुळे धुळ प्रदुषणाचा त्रास वाढल्याने रहिवाशांना श्वसनासंबंधीचे त्रास होऊ लागले होते. तसेच प्रत्यक्षात भुयारी मार्गाच्या काम सुरू झाल्यानंतर त्यातून निघणारी माती आणि दगडची वाहतूक संकुलांच्या दारसमोरून होणार होती. त्यासाठी कन्व्हेयर बेल्टद्वारे ही वाहतूक होणार होती. हा बेल्ट बंदीस्त नसल्यामुळे तसेच दररोज ३०० ते ५०० डम्परच्या वाहतुकीमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी मुल्लाबाग येथील भुयारी मार्गाचे काम तत्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली.

या बैठकीला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आणि मुल्लाबाग रहिवाशी संघाचे सदस्य आणि गृहसंकुलाच्यावतीने युवासेनेचे नितीन लांडगे, राकेश मोदी, आशुतोष शिरोडकर, गौतम दिघे, पल्लवी शेट्ये, पंकज ताम्हाणे, नितीन सिंग, दीपक पांडे, केतन खेडेकर, भिडे काका, मधुरेश सिंग, विजय जव्हारकर, दिलीप पुजारी, संतोष सावंत, शरद वारसकर,जयवंत धाणे हे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार भुयारी मार्ग मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर इमारतीच्या भिंतीपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बेल्टवरून वाहून आणला जाणारा राडारोडा नंतर युनी अपेक्स कंपनीच्या आवारात डम्पर आणि टिप्परमध्ये भरण्यात येईल आणि त्यानंतर तो घोडबंदर मार्गे वाहून दुसरीकडे नेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा तसेच धुळीचा त्रास होणार नाही. तसेच कन्व्हेयर बेल्टवरून टाकलेला राडारोडा आच्छादन टाकून बंदिस्त करण्यात येणार असल्याने तो रस्त्यावर पडून चिखल होणार नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते चांगले राहतील, असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुयारी मार्गाचे काम वेळेत होते की नाही ते पाहण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी या बैठकीत दिले. युनीअपेक्स कंपनीच्या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता प्रस्तावित असून भविष्यात येथे वाढणाऱ्या लोकवस्तीचा विचार करता ही जागा संपादित करून हा रस्ता देखील लवकरात लवकर करावा, तसेच या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेला अधिग्रहित करायची असलेली युनीअपेक्स कंपनीची जागा देखील लवकरात लवकर अधिग्रहित करावी असेही निर्देशही त्यांनी दिले.