वाढत्या प्रवासी संख्येच्या मागणीनुसार थांब्यांची निर्मिती भगवान मंडलिक कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील रिक्षा वाहनतळांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम घेण्याची तयारीही करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात सुमारे १२ हजारहून अधिक नोंदणीकृत रिक्षा आहेत. वाढत्या रिक्षा संख्येच्या प्रमाणात कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा, शहाड, आंबिवली, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांच्या भागात सुसज्ज वाहनतळ नाहीत. कल्याणमधील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ सोडले तर रेल्वे स्थानक, एसटी आगार, नागरी वस्तीच्या भागात पालिका प्रशासन रिक्षा वाहनतळांसाठी बहुद्देशीय इमारती उभारू शकले नाही. शहरातील अनेक भागांमध्ये प्रवासी, रिक्षा संख्या वाढली तरी रिक्षा उभ्या करण्यासाठी प्रशस्त जागा नाही. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये रिक्षा वाहनतळ निर्माण करून चालक प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लावणे, रिक्षांसाठी पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून देणे यासाठी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मार्च महिन्यात उपप्रादेशिक, वाहतूक, केडीएमटी, पालिका अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली होती. त्या बैठकीत रेल्वे स्थानक, नागरीकरण झालेल्या भागात रस्त्यांवर असलेले रिक्षा थांबे, वाहनतळ यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे तसेच वाहनतळांची संख्या वाढविण्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी चारही विभागांच्या अधिकाऱ्यांनी शहरातील बस, रिक्षा थांबे, वाहनतळ यांचा विचार करून या सुविधेत सुसूत्रता येईल या दृष्टीने सविस्तर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मध्यंतरी करोनाची दुसरी लाट आल्याने हे काम रखडले होते. दरम्यान, या पाहणी अहवालाचे काम आता सुरू करण्यात आले असून येत्या १० दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना पाहणी समितीमधील अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मोटार वाहन निरीक्षक, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, केडीएमटी, पालिका अधिकारी यांचे प्रतिनिधी पाहणी समितीत आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले. समितीच्या पाहणी अहवालाला मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या समन्वय समितीकडून मंजुरी घेतली जाईल. त्याप्रमाणे पालिकेला कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या जातील, असे चव्हाण यांनी सांगितले. प्रवाशांच्या सोयीप्रमाणे रिक्षा थांबे वाढविणे, वाहतूक कोंडीला त्रासदायक ठरणाऱ्या रिक्षा थांब्यांना बाजूला पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, शेअर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनतळांवर फलक लावणे ही कामे पालिकेच्या सहकार्याने येत्या महिनभरात केली जातील. - तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण पालिका क्षेत्रात रिक्षा हेच प्रवाशांचे वाहतुकीचे मुख्य साधन आहे. रिक्षाचालकांसाठी प्रशस्त वाहनतळ नसल्याने त्यांना रस्त्यावर, उपलब्ध वाहनतळावरून प्रवासी वाहतूक करावी लागते. आता रिक्षांना चांगले वाहनतळ उपलब्ध होतील. - शेखर जोशी, रिक्षा चालक-मालक संघटना