डोंबिवली - राज्यातील वाढती लाचखोरी, गैरव्यवहार, महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, भूमाफियांंकडून पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी येथील मानपाडा भागातील विद्यानिकेतन शाळेने गैरव्यवहारी रावणाच्या प्रतीमेचे दहन सोमवारी दुपारी करण्यात आले.शाळेच्या आवारात विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी आणि शाळा संस्थापक विवेक पंडित, संचालक अतुल पंडित यांंच्या उपस्थितीत हा रावण दहन कार्यक्रम पार पडला. कल्याण डोंबिवली पालिकेचा प्रशासकीय कारभार, नागरी समस्या, खड्डे, खराब रस्ते या विषयांवर नेहमीच रोखठोक बाण्याची भूमिका घेणाऱी विद्यानिकेतन ही डोंबिवलीतील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. गेल्या दोन महिन्याच्या काळात डोंबिवली, कल्याण मधील खड्ड्यांच्या विषयावर विद्यानिकेतन शाळेने राजकारणी, प्रशासनातील अधिकारी यांना उद्देशून टीकात्मक स्वरुपाचे फलक शाळेच्या बसवर लावले होते. हा शाळेचा नियमितचा उपक्रम आहे. हेही वाचा >>>डोंबिवली: लोकलमध्ये विसरलेली पिशवी महिलेला रेल्वे जवानांकडून परत दसऱ्याचे निमित्त साधून विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून राज्यातील अनागोंदी, सत्तेसाठी सुरू असलेला लाळघोटेपणा, गैरव्यवहार, पर्यावरण ऱ्हास, खड्डे, खराब रस्ते, शासन अधिकाऱ्यांची वाढती लाचखोरी, महिलांवर दिवसाढवळ्या होणारे हल्ले, अत्याचार अशा सर्व विषयांना एकरूप करणारा एक कापडी रावण बुजगावण्या स्वरुपात तयार केला. विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. या रावणाचे दहन करून अनागोंदीला आमंत्रण देणाऱ्या या विखारी विषयांचे दहन रावणाच्या माध्यमातून करण्याचे शाळेने ठरविले. दसऱ्यानिमित्त मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी दुपारी रावणाच्या प्रतीमेचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.