दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सतत सतर्क असते. आज सकाळी (दि. ९ डिसेंबर) महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि एनआयए यांनी संयुक्तपणे केलेली कारवाई अतिशय मोठी असून या कारवाईतील आणखी माहिती थोड्या वेळातच समोर येण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडे या संकेतस्थळाने एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाळे आणि इसिसच्या हस्तकांशी संबंधाचा कट यानिमित्ताने उघड होणार आहे. भारतात इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी गुंतलेल्या एका मास्टरमाईंडचा या जाळ्यात समावेश होता. भारतीय भूमीत दहशतवादी करण्याचा कट या नेटवर्कने रचला होता, असेही सांगितले आहे.

ठाण्यातील पडघा गावात सर्वात मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या बातमीनुसार या संपूर्ण कारवाईत सध्या १५ जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रात सतत अशाप्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. तरुणांना दहशतवाद्यांच्या कट्टर विचारसरणीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.