भगवान मंडलिक, लोकसत्ता कल्याण- श्रावण महिन्यात रानावनात उगविणाऱ्या जंगली भाज्यांना भोजनात विशेष स्थान असते. रानभाज्यांना श्रावण महिन्यात असलेली वाढती मागणी आणि त्याचा पुरेसा पुरवठा बाजारात होत नसल्याने रानभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. रानभाजी खरेदी करणाऱ्यांना भाजीचा दर ऐकून चटका बसत आहे. आदिवासी, जंगल, गाव खेड्यात राहणाऱ्या महिला रानभाजा विक्रीचा व्यवसाय करतात. दिवसा जंगलात जाऊन रानभाज्या खुडून, कापून आणायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या तालुका, शहरी भागात नेऊन विकायच्या. अशी अनेक वर्षाची पध्दत आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मलंगगड परिसर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, तळोजा, शहापूर, मुरबाड भागातील आदिवासी, ग्रामीण महिला सकाळीच टोपलीमध्ये, पिशवीत रानभाज्या घेऊन येतात. रेल्वे स्थानक भागातील इमारत, विजेच्या खांबाचा आडोसा घेऊन भाजी विक्री करतात. रानभाजी विकून एक महिला दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमावते. हेही वाचा >> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! जंगलात शेकडो प्रकारची वनसंपदा असते. गवत, झुडपे यांचा धांडोळा घेत अचूक रानभाजी शोधणे हे मोठे कसब असते. ठरावीक महिलांना रानभाज्यांची माहिती असल्याने त्या गटाने जंगल भागात अचूक ठिकाणी जाऊन रानभाज्यांचा शोध घेतात. यावेळी त्यांना जंगलातील खाजकुजली, उपद्रवी वनस्पतींना तोंड द्यावे लागते. जंगलात ठराविक भागात विशिष्ट रानभाजी उगवलेली असते. करटोलीचा वेल हा विशिष्ट ठिकाणीच असतो. टाकळा, लोथ, घोळु, करडू, दिंडे, खापरा, शीन, कोळू, माठ, रानमाठ, काटेमाठ, तांदुळजा, आघाडाची कोळी पाने या रानभाजा विशिष्ट भागात जंगलात जून-जुलैनंतर उगविण्यास सुरुवात होतात. या रानभाज्यांचा काळ एक ते दोन महिने असतो. त्यानंतर या भाज्यांचा बहर ओसरतो, असे रानभाज्या विक्रेत्या महिलांनी सांगितले. उत्पन्नाचे साधन जून ते ऑक्टोबर हा रानभाज्यांचा काळ असतो. या कालावधीत विविध प्रकारच्या रानभाज्या जंगलात उगवत असतात. या रानभाज्या काढून त्या शहरी भागात, तालुक्याच्या ठिकाणी, महामार्गालगतच्या रस्त्यावर बसून विकायच्या आणि त्या माध्यमातून उपजीविकेचे साधन तयार करुन कुटुंबगाडा चालविण्याचे काम अनेक आदिवासी, ग्रामीण महिला अनेक वर्ष करतात. रुचकर भाज्या रासायनिका खत नसल्याने आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढल्या असल्याने या भाज्यांना विशिष्ट चव असते. तेल, कांदा यांची भर या भाज्यांना दिली की अतिशय रुचकर पध्दतीने त्या खाण्यासाठी तयार होतात. या भाज्या औरोग्यदायी असल्याने या भाज्या खरेदीसाठी शहरी भागात अनेक नागरिक उत्सुक असतात. श्रावण महिन्यात रान भाज्यांना भोजनात सर्वाधिक पसंती दिली जाते. भाज्यांचे दर करटोली वाटा २० रुपये (८ करटोली) लोथ- २५ रुपये जुडी कोळू जुडी- २५ रुपये जुडी दिंडे- २० रुपये करडू- २० रुपये वाटा खापरा- १५ रुपये जुडी शीन वाटा-२५ रुपये आघाडा कोळी पाने वाटा २० रुपये टाकळा २५ रुपये घोळु २५ रुपये शेवगा कोवळी पाने १५ रुपये