भगवान मंडलिक कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयु) रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने डोंबिवलीतील उर्सेकरवाडी संत सावळा भाजी मंडई इमारती मधील नोबल रुग्णालया बरोबर सामंजस्य करार केला आहे. दोन वर्षासाठी पालिकेने ही सेवा नोबल रुग्णालयाकडून घेतली आहे. पालिकेचा दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प असताना अशा सेवेसाठी पालिकेला खासगी रुग्णालय आणि सेवेची गरजच काय, असे प्रश्न वैद्यकीय क्षेत्र, लोकप्रतिनिधींकडून उपस्थित केले जात आहेत. राजकीय वरदहस्तामुळे पालिकेने ही सेवा घेतली असल्याचे काही राजकीय मंडळींच्या चर्चेतून समजते. हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व मधील ४४ एकरचा हरितपट्टा बेकायदा बांधकामांच्या विळख्यात पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप आणि नोबल रुग्णालयाचे संचालक डाॅ. योगेश सरोदे यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नोबल रुग्णालयाचे डाॅक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी आठवड्याचे सात दिवस २४ तास पालिकेच्या अति दक्षात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देणार आहेत. अति दक्षता विभागात दाखल प्रत्येक रुग्ण खाटे मागे पालिका प्रशासन नोबल रुग्णालय एक हजार ५५५ रुपये शुल्क देणार आहे, असे करारपत्रात म्हटले आहे. १० फेब्रुवारीपासून या कराराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अतिदक्षता विभागात लागणारी रुग्ण सेवेसाठी सर्व वैद्यकीय सामग्री, औषधे पालिकेने नोबल रुग्णालयाला उपलब्ध करुन द्यायची आहे. या कक्षात रुग्णावर उपचार करताना काही कायदेशीर, रुग्ण सेवेत प्रश्न निर्माण झाले तर ती जबाबदारी नोबल रुग्णालयाची असेल स्पष्ट करण्यात आले आहे. अति दक्षता विभागातील रुग्ण सेवेसंदर्भात प्रशासनाला काही वाटले तर हा करार रद्द करण्याचा अंतिम निर्णय पालिका आयुक्तांचा असणार आहे. रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोबल रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेबद्दल समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. हेही वाचा >>> उल्हासनगर पालिकेत कोणतीही भरती नाही, बनावट संदेशांमुळे पालिका प्रशासनाला जाहिरात देण्याची वेळ खासगीकरणाला विरोध पालिकेचा अर्थसंकल्प दोन हजार कोटीचा आहे. आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद त्यात आहे. तरीही ही खासगीकरणाची वेळ पालिकेवर का आली, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाच वर्षापूर्वी वैद्यकीय खाते असताना त्यांनी कडोंमपा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ, इतर विविध आजारांचे डाॅक्टर भरतीसाठी ९० पदे तात्काळ भरतीसाठी मंजुरी दिली होती. आवश्यक तेवढे वेतन, निवासासाठी रुग्णालय परिसरात सुविधा नसल्याने बहुतांशी तज्ज्ञ डाॅक्टर पालिकेत सेवा देण्यास इच्छुक नसतात, असे निवृत्त पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. “ कोट्यवधीचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेला आयसीयु कक्ष चालविता येत नाही, ही शोकांतिका आहे. राजकीय आशीर्वादाने अशा गोष्टी घडत असतील तर ते चिंताजनक आहे. करदात्या पैशांची उधळपट्टी होत असल्याने याप्रकरणात शासनाकडे तक्रार करणार आहोत.” -प्रसाद मधुकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गोखलेवाडी, डोंबिवली “ पालिका रुग्णालयातील अति दक्षता विभागात बाह्यस्त्रोत यंत्रणेतून प्रशासन सेवा घेत आहे. १० रुग्णशय्या या कक्षात असतील. करोना साथीत आपण जी यंत्रणा राबविली, त्याचप्रमाणे ही सेवा घेण्यात आली आहे.” -सुधाकर जगताप, उपायुक्त आरोग्य विभाग