कडाक्याच्या थंडीत उघडय़ावर रात्र
तलासरी आणि डहाणू तालुक्यांत गेल्या दोन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री भूकंप झाल्यास दुर्घटना होण्याच्या भीतीने या दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांतील नागरिक रात्री घराबाहेर झोपत आहेत. कडाक्याच्या थंडीमध्ये बाहेर उघडय़ावर झोपण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर रोजी ३.२, २४ नोव्हेंबर ३.३ आणि १ डिसेंबर रोजी ३.३ रिश्टर स्केलचे मोठे धक्के बसले होते. काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. घराची हानी होऊन जीवितहानी होण्याच्या भीतीने अनेक ग्रामस्थ घराबाहेरच झोपत आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी शासकीय पातळीवर भूकंपाची कारणे शोधण्यात अपयश आले आहे. तीन रिश्टर स्केलचे धक्के मोठे नसून सहा रिश्टर स्केलपेक्षा मोठा धक्का धोकादायक असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र तरीही जिवाच्या भीतीने अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. धुंडवडी परिसरातील अनेक कुटुंबांनी तर भूकंपाच्या भीतीने स्थलांतराचा विचार बोलून दाखवला.