‘पडू आजारी मौज वाटे भारी’ हे कवितेत छान वाटत असले तरी एखाद्या व्याधीचा प्रत्यक्ष सामना करताना वास्तवात अतिशय वेगळा अनुभव येत असतो. भय, निराशा आणि असुरक्षिततेमुळे अशी व्यक्ती भांबावून जाते. त्या वेळी कुणाच्या तरी आधाराची आवश्यकता भासू लागते. कॅन्सरशी सामना केल्यानंतर अरविंद जोशींना यासंदर्भात एखादा स्व-मदत गट स्थापन करावा, असे वाटू लागले आणि त्यातून आधाररेखा प्रतिष्ठानची स्थापना तीन वर्षांपूर्वी झाली. गेल्या रविवारी प्रतिष्ठानच्या वतीने सहयोग मंदिर सभागृहात आनंद आधार ही अभिनव आरोग्य जत्रा आयोजित करण्यात आली होती. त्यात विविध आजारांविषयीची माहिती तज्ज्ञांमार्फत दिली गेली. ठाणे परिसरातील शेकडो नागरिकांनी या आरोग्य जत्रेचा लाभ घेतला. त्यानिमित्त या स्व-मदत गटाच्या कार्याविषयी माहिती देणारा लेख..

सुदृढ आरोग्य ही माणसाची खरी श्रीमंती आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने ते जपण्याचा प्रयत्न करतो. मात्र ‘प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर’ हे ठाऊक असूनही आणि त्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेऊनही अनेकदा व्याधींचा सामना करण्याची वेळ येते. विशेषत: कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागणाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसतो. त्यामुळे मूळ आजाराबरोबरच रक्तदाब, अतिताण, निद्रानाश आदी समस्या उद्भवतात. अशा व्यक्तींच्या मनात ‘आपल्यालाच का’ असा पहिला प्रश्न स्वाभाविकपणे येतो. त्यातून त्यांच्या मनावर निराशेचे ढग जमा होतात. अशा मानसिक अवस्थेत औषधांचा योग्य तो परिणाम होणे मुश्कील असते. काही वेळा चुकीचे सल्ले दिले जातात. त्यामुळे नाहक भरुदड होऊन त्याचा फारसा उपयोगही होत नाही. काही लोक अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन गावठी उपाय करण्यात वेळ घालवितात. अशा वेळी योग्य औषधोपचाराबरोबरच त्या व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची आवश्यकता भासते. अशा वेळी त्या विशिष्ट आजारातून सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरतो. जगभरात विविध प्रकारचे स्व-मदत गट (सपोर्ट ग्रुप्स) आहेत. त्याच धर्तीवर आयुष्यात कॅन्सरशी गाठ पडलेल्या रुग्णांचाही एखादा स्व-मदत गट का असू नये, असा प्रश्न ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या मनात आला. कारण काही वर्षांपूर्वी जोशी स्वत: या अनुभवातून गेले होते. ठाण्यातील काही लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यासाठी स्वत: पुढाकार घेतला आणि तीन वर्षांपूर्वी ‘आधाररेखा प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

अगदी नेमके सांगायचे झाले तर २०१३ च्या मे महिन्यात आधाररेखा प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. आरोग्यविषयक एक लघुपट प्रदर्शित करून संस्थेने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला एक अनौपचारिक गट असेच त्याचे स्वरूप होते. पुढे मात्र सार्वजनिक न्यास म्हणून त्याची रीतसर नोंदणी झाली. गेल्या तीन वर्षांत ‘आधाररेखा’ परिवाराच्या कक्षा बऱ्याच रुंदावल्या आहेत. ठाणे परिसरातील पन्नासएक कार्यकर्ते संस्थेला लाभले आहेत. संवेदनशील मनाच्या या व्यक्ती एकमेकांना भेटून आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक पद्धतीने उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. इतरांना योग्य तो सल्ला देतात. आजारानंतर घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन करतात.

यासंदर्भात ‘आधाररेखा’चे संस्थापक अरविंद जोशी यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, आधुनिक युगात अनेक दुर्धर आजारांवर औषधे उपलब्ध असली तरी ती महागडी आहेत. शिवाय केवळ औषधोपचार आजारातून बरे होण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे व्याधींवरील उपायांचा शोध घेण्यापेक्षा मुळात व्याधी का उद्भवतात याचा आत्मशोध घ्यावासा वाटला. आधुनिक आणि धावपळीची जीवनशैली (लाइफ स्टाइल डिसीज्) हे वाढत्या आजारांचे कारण आहे. बैठे काम, कालमर्यादांचा दबाव, विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न ही आधुनिक जीवनशैलीची लक्षणे आहेत. त्यामुळे बिघडलेल्या जीवनशैलीत योग्य तो बदल घडवून आणणे, आहाराविहाराचे नियम पाळणे, त्यातून साधी तणावमुक्त जीवनशैली निर्माण करणे ही संस्थेच्या कार्याची रूपरेखा ठरली.

आरोग्याबाबत आहार म्हणजेच अन्नाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे आहारविषयक तज्ज्ञांची व्याख्याने आधाररेखेने आयोजित केली. त्याला खूप चांगला प्रतिसाद लाभला. केवळ ठाणेच नव्हे तर अगदी अंबरनाथ-बदलापूर परिसरातूनही आधाररेखेशी माणसे जोडली गेली. याच उपक्रमाचा एक पुढचा भाग म्हणून आरोग्यदायी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. त्यात कॅन्सररुग्णांना उपयुक्त पाककृती स्पर्धकांनी सादर केल्या. या स्पर्धेतून उद्बोधन आणि प्रबोधन झाले. कॅन्सर तपासणी शिबिराला खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्यात कॅन्सरविषयक सर्व तपासण्या संस्थेने अतिशय अल्पदरात उपलब्ध करून दिल्या. नामांकित कॅन्सरतज्ज्ञांनी त्यासाठी आपले योगदान दिले. तब्बल शंभर जणांनी याचा लाभ घेतला. या आरोग्याच्या संबंधित उपक्रमांबरोबरच काही मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजनही संस्थेने केले. पुण्यातील आस्था संस्थेच्या डॉ. शेखर कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला हिलिंग हार्मनी त्यापैकी एक. उपचारांपेक्षा काळजी घेणे कधीही चांगले असते. त्याबाबतीत आपले पारंपरिक आयुर्वेदिक शास्त्र फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे ‘आधाररेखा प्रतिष्ठान’च्या वतीने गेल्या तीन वर्षांत निरनिराळ्या आयुर्वेद उपचारांविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चिकित्सा शिबिरे भरविण्यात आली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ‘आधाररेखा प्रतिष्ठानची’ ची सुरुवात जरी आयुष्यात कॅन्सरशी सामना करून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांनी केली असली तरी हा स्व-मदत गट फक्त कॅन्सरशी निगडित राहिलेला नाही. दैनंदिन जीवनात भेडसावणारे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आदी व्याधींविषयीसुद्धा आधाररेखा प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. रविवारच्या आरोग्य जत्रेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादाने ‘आधाररेखा’ मित्रांचा हुरूप वाढला असून असेच नावीन्यपूर्ण उपक्रम भविष्यातही राबविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

संपर्क- ९९६९०३८८१४.