भुयारी मलनिस्सारण योजनेचे काम पुन्हा रखडले; नालेसफाईही अपूर्ण

भुयारी मलनिस्सारण योजनेचे रखडलेले काम, अपूर्ण नालेसफाई आणि नाले बुजवून झालेली अनधिकृत बांधकामे यांमुळे यंदा पावसाळ्यात वसई-विरार शहर जलमय होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

वसई-विरार शहरात जागोजागी अनधिकृत बांधकामे तयार झालेली आहे. अनेक ठिकाणी नाले-खाडी बुजवून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्याची वाट बंद झाली आहे. त्यामुळे ठिकाणी पाणी साचून जीवितहानी आणि वित्तहानी होणार आहे. पालिकने घाईघाईने नालेसफाईचे काम हाती घेतले आहे; परंतु अद्याप ती ५० टक्केही पूर्ण झाली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या सॅटेलाइट सिटी योजनेअंतर्गत भुयारी मलनि:सारण योजनेस प्रारंभ करण्यात आला होता. त्याची मुदत डिसेंबर २०१५ पर्यंत असताना ते काम पूर्ण झालेले नाही. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. या योजनेसाठी १३८ कोटी रुपये खर्च असून योजनेअंतर्गत ६१ किलोमीटर मुख्य पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. शहरातील हाऊसिंग सोसायटीमधील मूलभूत सांडपाणी या पाइपलाइनद्वारे वाहून नेले जाणार आहे. त्यासाठी विरार येथील सर्व मुख्य रस्ते खोदण्यात आले होते; परंतु ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ते पूर्ववत भरण्याचे काम अजूनही झाले नाही. त्यावर फक्त खडी आणि पावडर टाकल्याने या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

पावसाळ्यात भुयारी गटाराचे काम करता येणार नसल्याने हे काम पावसाळ्याआधी पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र ते झालेले नाही. परिणामी वसई-विरार शहर तुंबण्याची शक्यता असून नागरिकांना अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

– दिलीप पिंपळे, शिवसेना शहरप्रमुख, विरार.