उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
ठाणे : शिवसेना आणि भाजपची युती आजही आहे आणि उद्याही राहील, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना युतीवर शिक्कामोर्तब केला. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शिवआरोग्य योजना राबवून राज्य निरोगी करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाणे शहरातील विविध वास्तूंचे लोकार्पण तसेच विविध प्रकल्पांचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यानिमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. मात्र, या निवडणुकीनंतर युती झाली. त्यामुळे युती आजही आहे आणि उद्याही राहील असे त्यांनी सांगितले. शहरासाठी काही करण्याची इच्छा असणे अशी जाणीव असणारे लोक फार कमी असल्याचे सांगत त्यांनी जितो संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
सरकार आपलेच आहे पण, त्याच्यावर योजनांचा जास्त भार टाकणे योग्य नाही. अशा स्वयंसेवी संस्था शहरातील प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढे आल्या तर योजनाराबविणे शक्य होईल. चार वर्षांपूर्वी गुंडाळून ठेवलेली शिवआरोग्य योजनाही राबवली जाईल असे त्यांनी सांगितले.