भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कल्याण सत्र न्यायालयाचे साहाय्यक न्यायदंडाधिकारी पी. व्ही. मेढे यांनी समन्स बजावले. येत्या ३० मार्चला चव्हाण यांना न्यायालयात हजर राहायचे आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या गुन्हेविषयक शपथपत्रात चव्हाण यांनी जाणीवपूर्वक काही माहिती दडवल्याची तक्रार पालिकेतील सुरक्षारक्षक रमेश पौळकर यांनी केली आहे. चव्हाण यांच्यासह पाच जणांवर दोन वर्षांपूर्वी रामनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, दलित महिलेचा विनयभंग, ठार मारण्याची धमकी देणे हे गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीनंतर पौळकर यांनी निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली नव्हती.
खांबाला आदळून विद्यार्थ्यांचा मृत्यू
भिवंडी : येथील भोईवाडा परिसरात राहणारा आरिफ अब्दुल समद मोमेन (१६) हा बस अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. शहापूर भागातील एका महाविद्यालयात आरिफ शिकत होता. त्याचा भाऊ आरिश हाही त्याच महाविद्यालयात शिकत आहे. दोघेही महाविद्यालयातून बसने घरी परतत होते. भिवंडी परिसरातील राजीव गांधी उड्डाण पुलावर बसमधून बाहेर डोकावत असताना डोक्याला विजेचा खांब लागल्याने आरिफचा मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात उत्तम विसे (३०) या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन लाखांची घरफोडी
डोंबिवली: येथील तेलकोसवाडी भागात राहणाऱ्या अमोल मारुती पवार (२६) यांच्या घरी सोमवारी चोरी झाली. घराच्या मागील बाजूची खिडकी उचकटून चोरटय़ाने आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील दोन लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख चोरून नेले. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीत चोरी
भिवंडी : येथील कोनगाव परिसरात राहणाऱ्या शिवाजी मगन म्हात्रे (४०) यांच्या घरी गुरुवारी चोरी झाली. मुंब्रा येथे म्हात्रे आणि त्यांचे कुटुंब लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या वेळी चोरटय़ाने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ८२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये एक लाखाची घरफोडी
कल्याण : येथील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या आशीष सच्चिदानंद मिश्रा (२९) यांच्या घरी १५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान चोरी झाली. घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरटय़ाने लाकडी कपाटातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी शहरातील घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळवता न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.