भगवान मंडलिक डोंबिवली : १ एप्रिलपासून शासनाने मुद्रांक शुल्क, नोंदणी व्यवहारांमध्ये एक ते पाच टक्के दरापर्यंत कर वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या भागात बांधकाम व्यावसायिक संघटनांकडून मालमत्ता प्रदर्शनांचे आयोजन होऊ लागले आहे. हे आयोजन करत असताना मुंद्राक, नोंदणी शुल्कात वाढ करू नये अशी आग्रही मागणी विकसकांकडून होताना दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र एक एप्रिलपासून या शुल्कात वाढ होणार असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील खरेदी, विक्री व्यवहारांवर होईल, अशी भीती विकसकांकडून व्यक्त होत आहे. कर वाढीचा मोठा फटका डोंबिवली, कल्याण, बदलापूर क्षेत्रात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे, अशी माहिती विकासकांनी दिली. करोना काळात ठाण्यापलीकडील उपनगरांमधील बांधकाम क्षेत्राचे आर्थिक गणित लक्षात घेता या भागातील उद्योगाला ही झळ मोठय़ा प्रमाणावर जाणवली. दोन वर्षांतील मंदीचे वातावरण विचारात घेऊन शासनाने चालू आर्थिक वर्षांत मुद्रांक शुल्कात वाढ करणे गरजेचे नव्हते. कर वाढले त्याचा भार ग्राहकांवर पडतो. घर खरेदीसाठी इच्छुक ग्राहक यामुळे माघार घेतो. बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती, बांधकामाची आतापर्यंत किंमत ६४ टक्क्यांपर्यंत गेली आहे, असे डोंबिवली, कल्याण परिसरातील विकासकांनी सांगितले. मेट्रो धावत नसताना तीन वर्षांपासून पालिकेकडून एक टक्का मेट्रो कर बांधकाम आराखडा मंजूर करताना घेतला जातो. सुविधा नसताना आणि सुविधा दिल्यानंतर अमर्यादकाळ हा कर वसूल केला जाईल, अशी भीती विकासकांनी व्यक्त केली. नोंदणीकरण मुख्यालयातील एका उच्चपदस्थाने १ एप्रिलपासून नोंदणी शुल्कात वाढ होणार असल्याचे सांगितले. नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रावण हर्डीकर यांना संपर्क केला, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. १० टक्के वाढीचे सूत्र एका प्रतिथयश वास्तूविशारकाच्या सांगण्यानुसार बांधकामाची किंमत डोंबिवलीमध्ये प्रती चौरस फुटाला २५०० रुपये आहे. या किमतीवर १० टक्के वाढ तसेच १ टक्का मेट्रो सेस, सरप्लस कर शीघ्र गणकाच्या दरावर आकारला जातो. यानुसार १० टक्के कर वाढीचे सूत्र आहे. एमएमआरडीए क्षेत्रात सुमारे तीन हजारापर्यंत शीघ्रगणक दर आहेत. शहरी, नागरीकरण भागात नवीन करवाढीचा फटका बसेल. शीघ्र गणकानुसार एक घर खरेदीमागे सुमारे चौरस फुटाला ५०० ते ६०० आणि नागरीकरण भागात सुमारे ३०० ते ४०० रुपये वाढतील, असे विकासकांनी सांगितले. मुद्रांक, नोंदणीकरण शुल्क १ एप्रिलपासून वाढणार असल्याने घरांच्या किमतीमध्ये सुमारे १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीचा बोजा ग्राहकावर पडतो. करोना काळातील मंदी विचारात घेऊन शासनाने यावेळी करवाढ करण्याची गरज नव्हती. शासन पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. आता कुठे विकासक उभारी घेत होते. त्यात कर वाढीने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण केली आहे. - श्रीकांत शितोळे, अध्यक्ष, ‘एमसीएचआय’, कल्याण