ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन पदांच्या निर्मितीसंबंधी दिलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने गुरुवारी मान्यता दिली आहे. या मान्यतेनुसार उपायुक्त ते स्वच्छता निरीक्षक अशी ६८२ नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होणार असून त्याचबरोबर ठाणेकरांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेली आहे. त्या तुलनेत मात्र नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यात गेल्या तीन वर्षांत सहाशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना दोन ते तीन विभागांचा कार्यभार संभाळावा लागत असून यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. शहरात सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच प्रशासकीय काम करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नवीन पद निर्मिती संबंधीचा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास राज्य शासनाने गुरूवारी अंतिम मान्यता दिली असून यामुळे नवीन पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे महापालिकेतील ४४१ कालबाह्य़ झालेली पदे रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुख्य अन्न निरीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यावेक्षक, लोकशिक्षण अधिकारी, नियंत्रण यंत्रचालक तसेच अन्य पदांचा समावेश आहे. ही पद्दे रद्द केल्यामुळे या पदांवर सद्यस्थितीत कार्यरत असलेले व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पद भरती केली जाणार नाही. तसेच  महापालिकेतील काही पदांचे समायोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.