मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर झाला आहे. या पाण्याचा पुरवठा वागळे इस्टेट परिसराला होणार आहे. यामुळे या भागातील पाणी टंचाईची समस्या सुटण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती. त्यास मुंबई महापालिकेने मान्यता दिली असून यामुळे ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे पाणी प्रक्रियाविना मिळणार असून त्यावर ठाणे महापालिका प्रक्रिया करणार आहे. तसेच या पाण्याचे वितरण प्रमुख्याने वागळे इस्टेट परिसरात केले जाणार आहे.