मुंब्रा-ठाणेदरम्यान मंगळवारी झालेल्या पाच वेगवेगळ्या रेल्वे अपघातांत तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रामजोरे रामसोच यादव (६५) असे एका मृताचे नाव असून अन्य दोन मृतांची ओळख पटलेली नाही. तर अन्वर शेख (३६) आणि भाविज शेख (२५) हे दोन तरुण लोकलमधून पडून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनगरीय रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे वारंवार अपघात घडत असून त्याचबरोबर रेल्वे रूळ ओलांडण्यामुळेही अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. मंगळवारी दिवसभरामध्ये झालेल्या अपघातामध्ये रामजोरे यादव हे कळव्याजवळ दुपारी १२च्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले. रामजोरे हे व्यवसायाने सुतार असून त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील आहे. सध्या ते कळव्यातील गोपाळनगर येथे राहात होते. तर मुंब्रा-कळव्यादरम्यान दुपारी ११च्या दरम्यान एक २५ वर्षीय तरुण लोकलमधून पडून मृत्युमुखी पडला. तर त्याच ठिकाणी एक ३५ वर्षीय महिलाही रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अन्वर शेख हा मुंब्रा बोगद्याजवळ रेल्वेतून पडून जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.