अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची कसरत अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर भाजी मंडईच थाटण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी स्कायवॉकवरून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे भौगोलिक स्थान जरा वेगळे आहे, त्यात नियोजनबद्ध विकास न झाल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे आता या रेल्वे स्थानकाबाहेर मोठी कोंडी होताना दिसत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व किंवा पश्चिम अशा कोणत्याही भागात बाहेर पडताना विविध अडथळ्यांना पार करावे लागते. रिक्षाथांबे, भाजी विक्रेते, फेरीवाले अशा सर्वानी स्थानकाबाहेरचा परिसर व्यापला आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला. सुरुवातीला त्याची परिस्थिती जरा बरी होती. मात्र पालिकेकडे देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी आल्यानंतर स्कायवॉकची दुर्दशा सुरू झाली. रेल्वे प्रवाशांना पश्चिमेला स्थानकाबाहेर पडण्यासाठी हा स्कायवॉक उपयुक्त आहे. मात्र रेल्वेचा पूल संपताच सुरू झालेल्या या स्कायवॉकवर भाजी मंडईही सुरू होते. आधीच चिंचोळ्या असलेल्या स्कायवॉकच्या पायऱ्यांवर भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडलेले दिसते. त्यामुळे एका वेळी एकच व्यक्ती येथून चालू शकते. स्कायवॉकवर गेल्यावरही अशीच परिस्थिती पाहावयास मिळते. तिथेही आठ ते दहा फुटाच्या स्कायवॉकचा बहुतेक भाग भाजी विक्रेत्यांनी व्यापलेला पाहायला मिळतो. त्यामुळे येथेही नागरिकांना चालण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. प्रेमी युगुलांचा त्रास भाजी विक्रेत्यांबरोबरच स्कायवॉकवर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रेमी युगुलांचाही वावर पाहायला मिळतो. अनेकदा टवाळक्या करणाऱ्या युवकांचा घोळका येथे उभा असलेला दिसतो. गेल्या वर्षी अशाच एका टोळक्याने एका तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून मारहाण केली होती. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीनेही हालचाल करण्याची गरज आता व्यक्त होते आहे.