पावसाळा जसजसा मुरत जातो तसतसं निसर्गाचं रूपडंही बदलत जातं. ते अनुभवायचं असेल तर घरातून बाहेर पडून डोंगरदऱ्या गाठाव्या लागतात. तेवढे कष्ट घेतले तर जे काही अनुभवायला मिळतं ते शब्दांच्या पलीकडचं असतं..

जून-जुलै महिने तसे कोरडेच गेलेले. आभाळात विखुरलेले फुटकळ ढग पाहून छळ होऊ लागलेला. श्रावणातही घन-निळा बरसत नाहीये, तर टळटळीत ऊन आणि घामाच्या धारा लागलेल्या. अशा वेळी आम्हा ट्रेकर्सना कधी एकदा साडेतीन शक्तिपीठांचं- श्रीशिवराय, सह्यद्री, सिंधुसागर आणि मान्सून – यांचं स्मरण करतोय, दर्शन घेतोय, असं झालेलं. शक्तिपीठांच्या वारीसाठी इतिहासाच्या विलक्षण स्मरणांनी भारलेल्या राजांच्या ‘राजगड’ला भेट द्यायची होती. त्यातंच, गोनीदांनी राजगडाबद्दल लिहिलेलं एक वाक्य कित्येक र्वष डोक्यात होतं, की ‘पावसाळ्यात चला राजगडावर, लक्ष-लक्ष फुलं दाखवतो.’ एके दिवशी बाइक्स पिटाळल्या गुंजणमावळात – राजांच्या राजगडचा मान्सूनमधला पुष्पोत्सव बघण्यासाठी.
भेटला सखा पाऊस
नसरापूरला कडक ऊन पोळून काढत होतं. रस्त्यापल्याड तर शेत पेटलंय की काय असं वाटलं. जवळून पाहिलं, तर बांधावर अगदी आगीच्या ज्वाळा असाव्यात, अशा भडक तांबडय़ा-पिवळ्या पाकळ्या असलेली फुलं होती – ‘अग्निशिखा’ किंवा ‘कळलावी’ नावाची. ही फुलं आकर्षक, पण विषारी असतात. बाजूच्या गुंजेच्या शेंगांमधून लालभडक ‘गुंजा’ डोळे मिचकावत खुणावत होत्या. ‘रानतीळ’ आणि ‘विंचवी’च्या घुमटाकार फुलांसोबत, माजलेल्या ‘टणटणी’च्या पानं-कळ्या-फुलांमधली ‘सिमेट्री’ चकित करून गेली..
विंझरपासून राजगडाकडे वळलो, तेव्हा आभाळ गच्च भरून आलेलं. हवा कुंद झालेली. गडाचा बालेकिल्ला कुठे तरी ढगात हरवलेला. कानंदी-गुंजवणी नद्यांचं फुफाटणारं पाणी पाहून पावसाची गाठ-भेट पडू शकेल, अशी आशा वाटू लागली. तळ्याच्या काठाशी गवतामधून तरंगत होती ‘चिरे आमरी’ (ग्राऊंड ऑर्किड्स) नावाची विलक्षण बोलकी फुलं..
समोर होता अरुंद वळणा-वळणांचा रस्ता. अन् एका क्षणी अनपेक्षितरीत्या समोरून आली लपेटदार वळण घेणारी यष्टी बस. डबक्यातल्या तांबटलाल चिखलपाण्याचा फवारा उडवत निघून गेली. कटकट नाहीच, होता फक्त आनंदच! मावळातल्या लाल मातीत मिसळून गेल्याचा, एकरूप झाल्याचा!!!
आता आसमंतात दरवळत होता एक अवीट सुगंध – आमच्या मावळातल्या घमघमणाऱ्या भाताचा! आणि, चहूबाजूंना शेता-शिवारात उचंबळत होत्या रंगीबेरंगी लाटाच-लाटा – एकीकडे हिरव्याकंच भाताच्या रोपटय़ांच्या लाटा, दुसरीकडे खाचरांमधून खेळवलेल्या मातकट पाण्याच्या लाटा आणि मधल्या बांधावरच्या ‘मिकी माऊस’सारख्या दिसणाऱ्या ‘कवला’ (स्मिथिया) नावाच्या लक्षावधी देखण्या फुलांच्या लाटा..
राजगडच्या अग्गदी कुशीत पोहोचलो, तेव्हा मात्र ज्याची खूप वाट पाहिली, त्या सख्या पावसाने दमदार स्वागत केलं. पावसाला मनसोक्त भेटावं, म्हणून बाइक बाजूला घेतली. जोरात कोसळणारी सर ताड-ताड कोसळू लागली. नखशिखांत भिजवून गेली. ‘पाऊस खूपच आहे रे’, असं कुरकुरणाऱ्या मित्राला म्हणलं, ‘ऊल्ल’३ ६११८. ऌ४ेंल्ल ु८ि ्र२ ्रल्ल२’४ु’ी ्रल्ल ६ं३ी१.’ खिदळायला परत एक निमित्त मिळालं होतं..
पाऊस थोडका उणावला. अवघ्या गवताळ माळावर तजेलदार तृणपाती तरारलेली. ‘कुर्डू’ आणि ‘मंजिऱ्या’ नावाच्या या तुऱ्याच्या रंग-गंध-चवीवर भुललेल्या भुंग्यांची आणि फुलपाखरांची एकच लगबग लागून राहिलेली. वाऱ्याचा जोरात झोत आला आणि गवतामध्ये कुठलीशी नक्षत्र लुकलुकली. आमचं भाग्य थोर, की आम्हाला बघायला मिळाली होती ‘उडी चिरायती’ची स्वर्गीय फुलं!!!
राजगडावर उत्सव – फुलांचा
प्रत्येक वेळी राजगडवारी वेगळ्या वाटेने करायची, म्हणून आम्ही चढणार होतो पालखिंडीतून संजीवनी माचीकडे. लांबच्या प्रवासाने शिणलेले ढग पालखिंडीत विसावले होते – मस्त जादूई माहोल! पाण्यात निथळणाऱ्या चमकदार कळ्या आणि आकाशी-निळ्या रंगाच्या पाकळ्यांच्या फुलांच्या ‘भारंगी’ला दाद दिली आणि उभ्या धारेवरून पाऊलवाट चढू लागलो. भिजू नये म्हणून नाही, तर वाऱ्या-थंडी-पावसात अंगात ऊब टिकून राहावी म्हणून अंगावर पावसाळी जर्कीन चढवलेलं. तरीही नखशिखांत भिजलेलो. गच्च-दाट ढगांमुळे १० फुटांपलीकडे काही दिसेना. ढगांच्या पाश्र्वभूमीवर ‘हिरव्या निसुर्डी’च्या फुलांचे गुच्छ वाऱ्यासोबत डोलत होते. कारवीच्या कळ्या डवरल्या होत्या. रानात लवकरच कारवी घमघमणार होती. उंच कारवीच्या झुडपांच्या कॅनोपीमधून सळसळ आडवी जाणारी वाट पाहून ट्रेकर्स खूश.
आता उभ्या उभ्या चढावर धाप लागली म्हणून थबकलो. उभ्या डोंगर-उतारावर चिमुकली झुडपे दाटलेली. निळसर पाकळ्यांची महिरप आणि ब्रशचे सहज फटकारे मारावेत, असे तीन-चार पराग. याचं नावदेखील किती काव्यात्मक – ‘नभाळी’. पलीकडे एक अत्यंत मजेशीर फूल उमलेलं – ‘हळुंदा’ त्याचं नाव. दोन उभ्या अन् एक आडवी पाकळी – एखाद्या कीटकाला निवांत बसता यावं अशा रचनेची. खरी मजा म्हणजे, एखादा कीटक या फुलावर बसला, की अक्षरश: काही सेकंदांत आडव्या पाकळीच्या आतून एक नाजूकशी सोंड बाहेर येते. कीटकाच्या हालचालीमुळे या सोंडेवरील स्त्रीकेसर-पुंकेसरांचं परागीभवन होतं आणि कीटक उडून गेला की हळुंदाची ही सोंड परत पाकळीच्या आत लुप्त होते. निसर्गाच्या या अनोख्या चमत्काराला मनोमन वंदन केलं..
एव्हाना वाऱ्याचा फुफाटा रौद्र झालेला. शेवाळलेले झाडांचे बुंधे बाजूला टाकत, चिखलाळलेल्या बुळबुळीत वाटेवरून, ढगांची विलक्षण झुंबड अनुभवत, एकेक पाऊल रोवत हळूहळू राजगडची चढाई करत होतो. उजवीकडची दरी किती खोल कोसळलीये किंवा तासाभराची चढाई होऊनही संजीवनी माचीपाशी पोहोचायला अजून किती वेळ लागेल, याचा थांगपत्ता लागत नाहीये. ‘पिवळा तेरडा’, ‘रानहळद’ आणि ‘रानआल्या’च्या तुऱ्यांचे कवतूक करीत, छोटय़ाशा कातळटप्प्यापाशी आलो. आमची चढाईची वाट तोरणा आणि राजगड यांना जोडणाऱ्या जुन्या मार्गावर असल्याने, कातळावर कातळकोरीव पावठय़ा गवसल्या, अन् चढाई सोप्पी झाली. आणि अवचित एका क्षणी समोर उभी ठाकली संजीवनी माचीची बुलंद तटबंदी!!!
दाट ढगांच्या लाटांच्या दुलईतली संजीवनीची नागमोडी तटबंदी न्याहाळत आडवी वाट चालू लागलो. सोबतीला होते – शुभ्र नाजूक बाहू पसरलेल्या ‘पंद’ फुलांचे घोस; आभाळाचं प्रतिबिंब उतरलं असावं, अशा नाजूक पाकळ्या असलेली ‘दवबिंदू’ नावाची फुलं आणि हलक्या मंद आकाशी पाकळ्या आणि गाभ्यामध्ये चांदणीसारखी हलकी जांभळी छटा असलेल्या ‘निसुर्डी’ची नक्षी!
गडाच्या करकरीत तटबंदीवर ‘सोनकी’ची पिवळी चिटुकली फुलं जिथे-तिथे बहरली होती. आळूदरवाजाच्या उंबऱ्याला दंडवत करताना, कोणी जिवलग भेटल्याचा आनंद झाला. पावसा-वाऱ्याने कित्ती गारठलो होतो, पण तरीही संजीवनीच्या नागमोडी चिंचोळ्या तटबंदीमधून चालताना गडाच्या कुशीतली ऊब जाणवत होती. एकीकडे जुनी ओळख पटत होती, पण असं असलं तरीही गडाचं नावीन्य आणि कवतीकदेखील सरत नव्हतं..
पाऊस एव्हाना अंगात भिनलेला. ढगांच्या लाटांमधून भटकताना त्यांचा हलका तिखट गंध-स्पर्श नासिकाग्रास जाणवत होता. खोल श्वास घेऊन तो उरात साठवून घेतला. व्याघ्रमुखापाशी पोहोचलो तेव्हा पाऊस नव्हता, पण ढगातले स्वैर बाण हवेत मुक्तपणे उधळलेले आणि पाण्यावर थरकत होते आणि दोस्तांबरोबर रानफुलांवर आणि दुर्गस्थापत्यावर गप्पाष्टक रंगलेलं.
मऊमऊ मातीवर थबकलेल्या पाण्यातून चुबुक चुबुक करत, आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. ‘जाईन विचारीत रानफुला’ अशा ओळी गुणगुणतांना समोर आलेल्या ‘निळ्या चिरायती’च्या विलक्षण नाजूक देखण्या फुलांनी खिळवून ठेवलं. कातळामधल्या जेमतेम मातीच्या आधारावर ‘सीतेची आसवे’ नावाची चिमुकली फुलं उमललेली. इतकी नाजूक फुलं कीटकभक्षी असतात, यावर विश्वास बसेना..
संजीवनी माचीचे तीन टप्पे हळूहळू चढत बालेकिल्ल्याजवळ पोहोचलो, अन् आभाळमाया ओसंडून वाहू लागली. रिमझिम रेशीमधारा अलगद बरसू लागल्या. काळ्याकभिन्न कातळभिंतीला मान्सूनचे ढग ढुश्या देत होते, लगट करत होते, रिते होत होते अन् विखरून जात होते. परत पुढची ढगांची लाट तयारच असायची. एरवी रौद्र भासणाऱ्या बालेकिल्ल्याच्या कातळावर आता मात्र जलौघ पाझरत होते. रुणझुणणाऱ्या पाण्याच्या धारांचा अवीट नाद घुमत होता. कातळावर ‘पाणतेरडा’ आणि ‘कापरू’चे गुच्छ बिलगलेले आणि टिकून राहिलेले. अवचित एके क्षणी पाऊस उणावला, वाऱ्याचा झोत आला आणि एक जादूई क्षण आला – अवघ्या आसमंतात थेंबांची ‘फुलपाखरं’ उधळली, विखुरली, चिंब करून गेली..
गारठय़ात दात थडथडू लागलेले. दोन चहा पिऊनही समाधान नाहीच, पण शांत समईच्या प्रकाशात उजळलेल्या आई पद्मावतीला दंडवत घातल्यावर ऊब जाणवली. शिवराय-सह्यद्री-मान्सूनच्या ओढीतून आम्ही राजगडाकडे धाव घेतली होती. त्यामुळे गडपुरुष सुखावत असेल..
नेहमीच ज्याचा त्रास होतो, ती एक गोष्ट अर्थातच खुपत होती. पिकनिकछाप पब्लिकने आपल्या परीने जास्तीत जास्त कचरा केला होता. दीड-दोनशेच्या संख्येने ट्रेक्स काढणाऱ्या ग्रुप्सचा सुगीचा हंगाम. गडावर माकडचाळे करणाऱ्यांना ऊत आला होता. हल्ली कोणालाच ज्ञान नको असतं, पण अशांनी संवर्धन वगैरे प्रयत्न जरी केले नाहीत तरी हरकत नाही, पण कृपा करून आमच्या सह्याद्रीला दुखावू नका. सह्यद्रीचं सर्जन पुन्हा फुलायला, डवरायला समर्थ आहे..
पद्मावती तळ्याच्या निळ्यारेशमी पाण्यावरची थेंबांची नक्षी पाहून मन प्रसन्न झालं. बालेकिल्ला अन् तळी-टाकी-जोती असं सारं काही चिंब भिजलं होतं, ढगात हरवलं होतं. सुवेळा माचीकडे जाताना ‘वाऱ्याने हलते रान’ची अनुभूती आली आणि रंगांच्या रानात हरवून गेलो. झाडांची खोडं शेवाळलेली. खोडाला बिलगलेल्या आमरीचे (ऑर्किड) झुबके पाहून मन लोभलं. काळेश्वरी बुरुजापाशी शंखनितळ पाण्यावर वाऱ्यासोबत येणारे नाजूक तरंग अनुभवत बसून राहिलो..
सरीवर सर येत राहिल्या, येतच राहिल्या. आणि शिवराय-सह्यद्री-मान्सून अशा शक्तिपीठांच्या ऊर्जेच्या अनुभूतीने आम्ही भारावून गेलो. मनात भटकंतीचे सारे क्षण रुंजी घालू लागले,
पाचूचं हिरवं माहेर,
अन् ओथंबलेलं आभाळ,
वळणवेडा रस्ता,
राजांच्या मावळातला,
भात खाचरे घमघमणारी,
चिंब पालवी सळसळणारी,
थेंबांची नक्षी,
अन् लोभस चिमुकले पक्षी,
फुफाटलेली नदी,
अन् गूढरम्य ती दरी,
निसरडय़ा पाऊलवाटा,
अन् चुकणारा काळजाचा ठोका,
थरथरणारी पानं,
अन् गारठवणारं वारं,
उत्सव अनवट सौंदर्याचा,
उत्सव नाजूक रानफुलांचा,
उसासणारे तटबुरूज,
अन् गतवैभवाची सय,
नखशिखांत भिजलेलं गात्र,
पण मन मात्र तप्त,
भटकंती उत्कट क्षणांची,
भटकंती मनसोक्त आनंदाची,
अनुभवला होतो..
राजगड, फुलं आणि बरंच काही
साईप्रकाश बेलसरे – response.lokprabha@expressindia.com