गुजरातमधील पचौत गावात राहणाऱ्या त्या ७० भटक्या कुत्र्याचं नशीब पालटलंय. कारण रातोरात हे ७० भटके कुत्रे कोट्यधीश झाले आहेत. या ओळी वाचून तुम्हीही गोंधळात पडला असाल. भटके कुत्रे कसे काय कोट्यधीश झाले? असा प्रश्न सहाजिकच तुमच्याही मनात आला असेल. पण हे खरंय. मेहसाणा बायपाय रोडचं काम सुरू आहे. त्यामुळे सहाजिकच या रस्त्यापासून काही दूर अंतरावर असलेल्या या गावातील जमिनींच्या किमतीचे भाव गगनाला भिडले आहेत. येथील काही जमिनीचे भाव साडेतीन कोटींच्या घरात आहेत. याच भागातील जवळपास २१ बिघा जमीन ही Madh ni Pati Kutariya Trust च्या नावे आहे. गावातील काही धनिकांनी फार पूर्वीच आपल्या जमिनी ट्रस्टला दान केल्या आहेत. या भागात असणाऱ्या जवळपास ७० हून अधिक भटक्या कुत्र्यांची इथे काळजी घेण्यात येते. ही जमीन भटक्या कुत्र्याच्या कागदोपात्री नावावर नसली तरी या जमिनीतून येणारं उत्पन्न त्यांच्या देखभालीसाठी वापरलं जातं. त्यामुळे भविष्यात या जमिनींची विक्री झाली तर सध्याच्या घडीला या जमिनींचे भाव पाहता प्रत्येक कुत्र्याच्या नावावर साधरण १ कोटी तर नक्की येऊ शकतील. वाचा : मिर्झा की मलिक ? सानियाच्या होणा-या बाळाचं आडनाव काय असणार? 'टाइम्स ऑफ इंडिया'ला या ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की 'मध नी पति कुतारिया ट्रस्ट'ची परंपरा गावातील काही धनिकांनी सुरु केली. मुक्या जीवांच्या कल्याणासाठी ते आपल्या मालकीची काही जमीन ट्रस्टला दान देऊ लागले. त्यावेळी या जमिनींच्या किंमती फारश्या नव्हत्या. गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा गावात आहे. येथे दरदिवशी कुत्र्यांना रोटला खाऊ घातला जातो. १५ जणं कुत्र्यांसाठी खाणं तयार करून त्यांना भरवण्याचं काम करतात. फक्त भटके कुत्रेच नाही तर इतर प्राण्यांचीदेखील काळजी येथे घेतली जाते. वाचा : ‘त्या’ बॅगवर मुंबईचं नाव थोडक्यात लिहिणं आजींना पडलं महाग, विमानतळावर एकच गोंधळ