मॅच संपल्यानंतर कधी स्टेडियमची हालत तुम्ही पाहिली आहे का? किती कचरा केलेला असतो तिथे. पताके, बोर्ड आणि कधी कधी तर खाण्याचे सामान तिथेच फेकून तो परिसर अस्वच्छ करणारे कितीतरी लोक आहेत. आपणच आपला आजूबाजूचा परिसर अस्वच्छ करत आहोत याची साधी लाजही अनेकांना वाटत नाही. बिचारे सफाई कर्मचारी निमूटपणे हा कचरा साफ करतात. कचरा इतर लोकांनी केलाय आपण कशाला साफ करायचा अशीही मानसिकता असणारे लोक आहेत. तेव्हा कचरा करणाऱ्यांनी आणि अशी मानसिकता बाळगणाऱ्यांनी मिझोराममधल्या फुटबॉल प्रेमींकडून शिकले पाहिजे. मॅच संपल्यानंतर या फुटबॉल प्रेमींनी असे काही केले की ज्याची दखल सगळ्यांनाच घ्यावी लागली. शिलाँगच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर फुटबॉल सामने सुरू होते. अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी जमली होती. हा सामना संपल्यानंतर स्टेडियमवर कचऱ्याचा ढीग जमला होता. काही प्रेक्षकांनी तिथेच कप्स, बोर्ड फेकले होते. हा कचरा पाहून फुटबॉलप्रेमी स्टेडियमवर थांबले. कचरावेचकांची वाट न पाहताच त्यांनी स्टेडियम साफ करायला सुरूवात केली. हे सारे ऐझवाल फुटबॉल क्लबचे चाहते होते. हा क्लॅब मॅच जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी थांबून संपूर्ण स्टेडियम साफ करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना मदत केली. आधी काही लोकांनी पुढाकार घेतला आणि नंतर एक एक करत सगळेच या चांगल्या कामात सहभागी झाले. तेव्हा या सगळ्यांचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत आहे. चांगले काम करण्याची सुरूवात आधी स्वत:पासून करायची हे या लोकांनी दाखवून दिले. मेघालयचे गृहराज्यमंत्री रॉबर्ट लिंगडोह यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. 'मॅच बघायला आलेल्या फुटबॉल प्रेमींनी पुढाकार घेऊन खूप चांगले काम केले आहे, त्यांच्याकडून प्रत्येकाने शिकले पाहिजे' असे लिहित त्यांनी कौतुक केले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी देखील हा फोटो शेअर करत कौतुक केले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे उत्तम उदाहरण म्हणजे या प्रेक्षकांनी केलेली ही कामगिरी आहे प्रत्येकांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे असे म्हणत त्यांनी गोयल यांनी कौतुक केले आहे.