चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरबरोबर आता पुन्हा कधीच संपर्क प्रस्थापित होऊ शकणार नाही. कारण विक्रम लँडर आणि त्यातल्या प्रग्यान रोव्हरचे आयुष्यच १४ दिवसांचे होते. चंद्रावर रात्रीच्या वातावरणात तग धरण्याच्या दृष्टीने या उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली नव्हती. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला.

नेमकं काय चुकलं
नेमकं त्यावेळी काय चुकलं याबद्दल इस्रोच्या एका माजी वैज्ञानिकाने खुलासा केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. स्पेस टेक्नॉलॉजी खूप किचकट आहे. ती शक्य तितकी सोपी ठेवावी. त्यात आणखी गुंतागुंत वाढवू नये. जे विक्रमच्या बाबतीत झाले. उदाहरणार्थ चार इंजिनचे कार्य एकसूरात एकाचपद्धतीने सुरु ठेवणे तांत्रिक दृष्टया आव्हानात्मक होते. त्यात मध्यभागी पाचवे इंजिन बसवण्यात आले.

इस्रोच्या या माजी वैज्ञानिकाच्या मतानुसार चांद्रयान-२ मोहिमेसाठी GSLV-Mk III रॉकेट उपलब्ध आहे हे आधी समजले असते तर लँडरमध्ये पाच इंजिनांऐवजी एकच शक्तीशाली इंजिन उपयुक्त ठरले असते. विक्रम सारख्या लँडरसाठी ३,५०० न्यूटॉनचे एकच इंजिन हवे होते. चार इंजिनांचे कार्य एकाच पद्धतीने सुरु ठेवण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या टाळता आल्या असत्या. जटिलता टाळता आली असती. अन्य देशांनी चंद्रावर आपले यान उतरवताना एकाच शक्तीशाली इंजिनचा वापर केला होता. एका इंजिनमुळे सॉफ्ट लँडिंग करणे शक्य झाले असते असा इस्रोच्या माजी वैज्ञानिकाने निष्कर्ष काढला आहे.

या वैज्ञानिकानुसार चांद्रयान-२ मोहिमेच्या मूळ योजनेत काही बदल करण्यात आले. आधी GSLV-Mk II लँडरसह चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्याची योजना होती. GSLV-Mk II मध्ये दोन टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना तिथे उडणाऱ्या धुळीमुळे लँडरचे नुकसान होऊ नये यासाठी लँडरच्या मध्यभागी पाचवे इंजिन बसवण्यात आले. पाचव्या इंजिनचा जो बदल करण्यात आला. त्यामुळे चांद्रयान-२ चे वजन वाढले. अन्य गोष्टी सुद्धा बदलाव्या लागल्या.

GSLV-Mk II ऐवढे वजन वाहून नेण्यास सक्षम नव्हते. त्यासाठी GSLV-Mk III ने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला असे या वैज्ञानिकाने सांगितले. सुरुवातीला चंद्रावर लँडिंगच्या वेळी चार इंजिन बंद करण्याची योजना होती. पाचवं इंजिन आल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागले. त्याची किती चांगल्या पद्धतीने चाचणी झाली होती त्याबद्दल काही माहिती नाही असे त्यांनी सांगितले. इस्रोकडे आता जो डाटा उपलब्ध आहे आणि काय अभ्यास करायचा राहून गेला ते शोधून काढावे लागेल.

इंजिनमध्ये बिघाड किंवा चुकीची माहिती टाकल्यामुळे अचानक अडथळा येऊन संपर्क तुटला असावा असे तज्ञांचे मत आहे. ताशी ७ किमी वेगाने आपल्या चार पायांवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या दृष्टीने विक्रमची रचना करण्यात आली होती. पण शेवटच्या मिनिटांमध्ये निर्माण झालेल्या काही अडचणींमुळे जास्त गतीने विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर धडकला असावा. जास्तीत जास्त प्रती सेकंद पाच मीटर वेगाने लँडिंग सहन करण्याची विक्रमची क्षमता होती. पण वेग त्यापेक्षा जास्त अल्यामुळे हे हार्ड किंवा क्रॅश लँडिंग असू शकते.