पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचं उद्धाटन करण्यात आलं असून आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांचाही गेल्या कित्येक दशकांची प्रतिक्षा संपली आहे असे कौतुगोद्गार त्यांनी काढले. या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होणार आहे. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. यानंतर यावर भाष्य करत महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीदेखील संस्थेचं कौतुक करत त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

“संस्थांना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो का नाही याबाबत माहिती नाही. ज्या प्रकारे बीआरओनं अतिशय मेहनत केली आहे त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. त्यांचं नाव भारत रत्न ऑर्गनायझेशन असं असलं पाहिजे,” असं महिंद्रा म्हणाले. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी लाईक आणि कमेंटही केले आहेत. अनेक युझर्न बीआरओच्या कामाची स्तुतीही केली.

बोगद्यात असणार अनेक अत्याधुनिक सुविधा

या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.

१९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.