आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दस-या दिवशी ठिकठिकाणी रावणाचे दहन केले जाते. वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणूनच आज रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. भारतात उत्साहात हा सण साजरा केला जातो पण असे असताना दुसरीकडे मात्र हिमाचल प्रदेशमधल्या बैजनाथ पाड्यावर मात्र दसरा साजरा केला जात नाही. याठिकाणी दस-याच्या दिवशी रावणाचे दहन करण्यास बंदी आहे.
रावणाचे दहन केल्याने भगवान शंकराचा गावावर कोप होईल अशी श्रद्धा येथल्या लोकांची आहे. तसेच यापूर्वी ज्याने कोणी या गावात दस-याच्या दिवशी रावण दहन केले त्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागले अशा दंतकथाही या गावत प्रचलित आहेत. फार पूर्वीपासूनच या दंतकथा ऐकण्यात आल्या असल्याने येथे राहणारा एकही गावकरी दस-याच्या दिवशी इथे रावणाचे दहन करत नाही.
रावणाशी संबधित एक दंतकथा या गावाशी जोडली आहे. रावण हा भगवान शंकराचा परम भक्त होता. शंकराला प्रसन्न करण्यासाठी रावणाने कठोर तपश्चर्या केली होती. लंकेत येण्याचा वरही रावणाने मागितला होता. शंकराने येण्याचे कबुल केले पण त्याचबरोबर रावणाला एक अटही घातली. आपली पिंडी लंकेच्या प्रवासापर्यंत जमीनीवर न ठेवण्याची ही अट होती. पण अनावधानाने ही  शंकराची पिंडी जमीनीवर ठेवली जाते. आणि भगवान शंकराला लंकेत आणण्याचे रावणाचे स्वप्न अपूर्णच राहते. ही पिंडी ज्या जागी ठेवण्यात आली ती जागा म्हणजेच बैजनाथ. त्यामुळे या गावात शंक-याच्या लाडक्या भक्ताचे दहन करणे म्हणजे शंकराच्या कोपाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे गावक-यांचे मत आहे. त्यामुळे दस-याच्या दिवशी येथील दुकानेही बंद करण्यात येतात.

baijnath-dham-620x400