अनेकदा आपल्याला दोन समाजांमध्ये एखाद्या छोट्यामोठ्या कारणावरून वाद होऊन तो विकोपाला गेल्याची उदाहरणे पहायला मिळतात. काही वेळेस तर या वादांमुळे आपला माणुसकीवरील विश्वास उठतो. मात्र असं सगळं असतानाही काही घटना आपल्याला लोकांमधील माणुसकी आणि एकतेची भावना कायम असल्याची जाणीव करु देतात. अशीच एक घटना दिल्लीमध्ये समोर आली आहे. दिल्लीमधील एका मुलीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे.

दिल्लीत राहणाऱ्या सानिया अहमद हसन या मुलीची फेसबुक पोस्ट सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने मशीदीमधील आजानच वेळी मंदीरामधील भजन काही काळ थांबवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये सानिया म्हणते, ‘मी दिल्लीमधील जमाई नगर परिसरामध्ये राहते. हा परिसर मुसलीम बहुल परिसर आहे. येथे काही हिंदू कुटुंबही राहतात. या परिसरामध्ये दर किलोमीटरला एखादी मशीद आहे. अशाच या परिसरामध्ये एक लहान आकाराचे मंदीर आहे. नवरात्रीमध्ये येथील स्थानिक हिंदू या मंदीरात भजन करतात. मात्र मशीदीमधील आजानच्या वेळी हे भजन काही काळ थांबवले जाते. तर दुसरीकडे या हिंदू घरांच्या जवळपास असणाऱ्या मांसविक्रेत्यांच्या दुकानांसमोर काळा पडदा लावला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा पडदा लावून हे दुकानदार आपला व्यवसाय करतात. स्थानिक हिंदूंचा या काळात उपवास त्यांच्या धार्मिक कार्यात अडथळा येऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते.’ ही दोन उदाहरणे शांततेत एकत्र राहण्याचे सौंदर्य दाखवतात.

या पोस्टला चार हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केले असून सव्वा दोन हजारहून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी अशाप्रकारच्या पोस्ट खरचं व्हायरल होण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे या पोस्टवर कमेन्ट करताना

सारे जहाँ से अच्छा…

विविधतेमध्ये एकता

हा खरा भारत

इच्छा असली की मार्ग सापडतो

नेत्यांनीही हे पहावे

दोन महिन्यापूर्वी श्रावणी एकदशी आणि बकरी ईद असे दोन्ही एकाच दिवशी आल्याने पंढरपूरमधील मुस्लीम समाजानेही अशाप्रकारच्या धार्मिक एकता दाखवत बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता. अशाप्रकारच्या समजुतदारीमुळेच समाजातील एकोपा आणि एकता टिकून राहते असेच म्हणता येईल.