सध्या पाऊस लांबला असल्याची चिन्ह असुन, राज्यावर दुष्काळी सावट आहे. शेतातील कोवळी रोप पाण्याअभावी व प्रखर उन्हामुळे करपत आहेत. अशावेळी जो पर्यंत पाऊस येत नाही तो पर्यंत या रोपांना जगवण्यासाठी एका शेतक-याने तर चक्क रोपांना बायकांप्रमाणे साड्या नेसवल्या आहेत. याचप्रमाणे अन्य शेतकरी देखील आपली पिक वाचवण्यासाठी विविध युक्त्या लढवत आहेत.

अशाच प्रकारे एका शेतातील कोवळ्या रोपांचे कडक उन्हापासून रक्षण करण्यासाठी शेतक-याने या रोपांना बायकांप्रमाणे साड्या नेसवल्या आहेत. या रोपांना दुरून पाहिलेतर शेतात काम करत असलेल्या बायकाच उभ्या असल्याचे आपल्याला क्षणभर वाटते. प्रसिद्ध पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी हे दृश्य कॅमे-यात टिपले असून, हा फोटो त्यांनी फेसबुकवरही शेअर केला आहे. या फोटाबाबत त्यांनी ‘गावोगाव बायका शेतात राबताना दिसतात. तशीच बायकांची गर्दी वाटली लांबून. जवळ गेल्यावर लक्षात आलं झाडाच्या रोपांना साड्या नेसवल्यात.’ असे म्हटले आहे.

प्रामुख्याने मराठवाड्यात पाणी टंचाईची भीषण समस्या आहे. बळीराजा आपल्या पिकांना जगवण्यासाठी जीवाचे रान करत आहे. शेतक-या प्रमाणेच सरकारही पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. एकीकडे माणसाला उन्हाळा असह्य होत असताना जनावारांबरोबरच शेतातीप पिकांचे देखील उन्हामुळे हाल सुरू आहेत. अरविंद यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या फोटोला अनेकांना लाइक करत त्यांच्या दृष्टिकोनाचे कौतुकही केले आहे. शिवाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत.