अखेर तो मंगल दिवस उजाडला, मंगळवारच्या मंगल सकाळी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींसाठी नियोजित वेळी, ब्रह्मकुमारी शिवानी यांचे प्रवचन पार पडले, किंवा हल्लीच्या मराठीत – ‘संपन्न’ झाले. आमदारांचे मानसिक, आत्मिक आणि आध्यात्मिक जीवन अधिक संपन्न व्हावे, एवढय़ाच हेतूने केलेला एक अट्टहास पूर्ण झाला, तडीस गेला. पण कसे झाले प्रवचन? त्याचा परिणाम काय झाला? ‘राजयोग शिका’ असे फलक काही वर्षांपूर्वी शहराशहरांत ठिकठिकाणी लावणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेसाठी गेले सुमारे दशकभर व्याख्याने देणाऱ्या आणि त्यासाठीच गाजलेल्या या व्याख्यातीने काय सांगितले आणि आपल्या लोकप्रतिनिधींच्या जीवनात त्यामुळे काय काय, कस कसा फरक पडणार आहे? हे मात्र काही केल्या कळले नाही. कसे कळणार? खरे तर सर्व चित्रवाणी वाहिन्यांनी कॅमेरे-माइकचे दंडुके घेऊन एकेकाला ‘कैसा लगा?’ विचारल्याशिवाय हल्ली एखादा ‘इव्हेंट’ कसा झाला हे समजतच नाही. अर्थात, विधिमंडळात एवढय़ा सकाळी, साडेनऊच्या सुमारास ठेवण्यात आलेले व्याख्यान अनेक चित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यतालिकेतून जसे निसटले, तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांनीही या व्याख्यानास न जाणेच पसंत केले. अर्थात, शिवानी यांचे प्रवचन कसे असते, याचे कुतूहल शमवण्यासाठी विधान भवन इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात जाण्याची गरज होतीच, असे नाही. शिवानी यांची व्याख्याने तर यूटय़ूबवर, आध्यात्मिक चित्रवाणी-वाहिन्यांवर घरबसल्या ऐकावयास मिळतात. सावकाश, हळू आवाजात, लाघवी शांत सुरातील त्यांचे बोलणे नुसते ऐकूनच बरे वाटू लागते, असा अनेकांना अनुभव असेल. मोठे प्रश्न त्या हाताळतच नाहीत. एकाही देवाचे नाव घेत नाहीत. परमात्म्याने तुम्हाला साधन म्हणून मानवी जीवन दिले आहे, अशी आठवण करून देतात. म्हणजे रूढार्थाने त्या हिंदू अथवा कोणत्याही एका धर्माचा प्रसार करीत नाहीत.

तरीही विधिमंडळातील विरोधकांनी, हे प्रवचन ठेवण्याची गरजच काय असा शाब्दिक हल्ला चढविला होता आणि ‘धार्मिक प्रवचने नको’ असे म्हणताना त्यांनी राज्यघटनेवर बोट ठेवले होते. खरे तर या विरोधकांना, राज्यपालांच्या अभिभाषणातूनसुद्धा आध्यात्मिक परमानंदाचीच अनुभूती येऊ शकली असती, पण अभिभाषणावरदेखील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बहिष्कार घातला. शिवसेनेचे सदस्य अभिभाषणास होते, पण शिवानी यांच्या  प्रवचनपर व्याख्यानाला जायचे की नाही ही  त्यांची खासगी बाब होती. हरयाणाच्या विधिमंडळात यापूर्वी एका जैन मुनींचे व्याख्यान झाले, तेव्हा तेथील मुख्यमंत्र्यांनी भाजपसह सर्व मित्रपक्षांना उपस्थितीची सक्ती केली होती म्हणतात. शिवानी यांचे हे व्याख्यान नियोजित वेळी, लक्षणीय उपस्थितीत ‘संपन्न’ झाले आणि त्याने एक ‘अनोखी’ आध्यात्मिक अनुभूती  दिली, असा गाजावाजा काही झाला नाही.

.. कारण तोवर चित्रवाणी वाहिन्यांसह सारेच निराळ्या विषयांच्या चर्चेत गुंतले होते.. हवाई हल्ल्याच्या बातम्यांमधील राष्ट्रवादी आनंद हा आध्यात्मिक आनंदापेक्षा वरचढ ठरला होता! आधी शाब्दिक आणि पुढे हवाई अशा दोन हल्ल्यांत हे प्रवचन गुदमरूनच गेले.