यंदाच्या गणेशोत्सवात दहा दिवसांत दीड लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण मुंबईतील ७३ नैसर्गिक स्थळे आणि १७३ कृत्रिम तलावांमध्ये १ लाख ५८ हजार २२९ गणेशमूर्तींचे व ६ हजार ५३२ हरतालिका व गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यापैकी ४७ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले. मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जातात. यंदा मुंबईकरांचा या कृत्रिम तलावांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कृत्रिम तलावांमध्ये ७९ हजार १२९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, तर उर्वरित ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आले आहे. या मूर्तींपैकी ७५ हजार ६८७ या घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या, तर उर्वरित ३ हजार ५०२ गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. मुंबईतील समुद्र, तलाव, जेट्टी अशा ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळांमध्ये ८५ हजार ६३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८२ हजार ३३९ गणेशमूर्ती होत्या, तर ३ हजार २९३ हरतालिका/ गौरी मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ८२ हजार ३३९ गणेशमूर्तींपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर ४ हजार ५२५ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्या.