पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशमधील प्रचारसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. चुकीचे काम करणा-यांचे स्क्रू टाईट केल्याने विरोधी पक्ष माझ्यावर चिडले आहेत अशी टीका मोदी यांनी केली आहे.जेव्हा वादळ येते तेव्हा प्रत्येकजण आधार शोधत असतो. यंदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे वारे वाहत असून भाजपरुपी वादळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव कोणाचाही आधार घेत आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी आणि काँग्रेस आघाडीवर निशाणा साधला. रविवारी उत्तरप्रदेशमधील अलीगढमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशमधील प्रचारसभेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. चुकीचे काम करणा-यांचे स्क्रू टाईट केल्याने काही राजकीय पक्ष माझ्यावर चिडले आहेत अशी टीका मोदी यांनी केली आहे. देशातील १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. यातील बहुसंख्य गाव उत्तरप्रदेशमधील होते. अजूनही उत्तरप्रदेशमधील गावांमध्ये ग्रामस्थ एकमेकांना वीज आली का असा प्रश्न विचारतात. वीज आल्यावर अजूनही लोक जल्लोष करतात. पण आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यापासून गावागावात वीज पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे असे त्यांनी सांगितले. एकदा तुम्ही गुंडांना आधार देणा-या नेत्यांना सत्तेपासून दूर केले की राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निकाली निघेल असे सांगत त्यांनी भाजपला मतदान करा असे आवाहन केले. उत्तरप्रदेशमध्ये संध्याकाळी महिला घरातून बाहेर पडू शकतात का ? असा प्रश्न विचारत महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणा-या सरकारला जनतेनेच शिक्षा द्यावी असे आवाहन त्यांनी केले. उत्तरप्रदेशमधील जनतेला आता न्याय आणि परिवर्तन हवे आहे. माझ्यासाठी विकास म्हणजे वि- विद्यूत, का- कायदा आणि स - सडक (रस्ता) असल्याचे सांगत मोदी म्हणाले राज्यात स्कॅम नको तर कमळ हवे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील काळा पैसाधारकांवर चाप बसला असा दावाही त्यांनी भाषणात केला.