आठ महिन्यांत ७१ हजार वाहनचालकांकडून सव्वादोन कोटींचा दंड वसूल वसई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. मागील आठ महिन्यांत वसई वाहतूक विभागाने ७१ हजार वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. सव्वादोन कोटी रुपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे. वसई विरार शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने कारवाई केली जात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे. वाहतुकीच्या समस्यादेखील मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागल्या आहेत. नियमांचे पालन होत नसल्याने अशा प्रकारच्या समस्येला सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची समस्या नियंत्रणात यावी यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असतात. मात्र काही वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालविणे, विनाहेल्मेट प्रवास, मद्यपान करून वाहन चालविणे, चुकीच्या लेनमधून गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, बेकायदा प्रवासी वाहतूक, वाहने नो पार्किंग झोनमध्ये लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विनापरवाना वाहन चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन वाहनचालक करीत असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने काही वेळा अपघात घडतात यात विशेषत: तरुणांचा समावेश असतो. अशा वाहनचालकांना आवर घालण्यासाठी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी ७१ हजार ९०६ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली आहे. या वाहनचालकांना २ कोटी ४३ लाख १६ हजार १०० एवढा दंड आकारण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताच्या घटना व इतर अडचणी निर्माण होत असतात. जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरूच असते. यापुढेही ही कारवाई अधिक तीव्रपणे सुरू राहणार आहे. - शेखर डोंबे, पोलीस निरीक्षक, वसई वाहतूक शाखा