वर्षभरात १ लाख २८ हजार जणांवर कारवाई वसई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. वसई विरार व मीरा भाईंदरमध्ये वर्षभरात वाहतूक पोलिसांनी १ लाख २८ हजार १४१ जणांवर कारवाई केली आहे. यात ३ कोटी ९७ लाख ८६ हजार ५५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे तर ७ कोटी ४८ लाख ८५ हजार ५५० इतका दंड आकारण्यात आला आहे. अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे अनेकदा वाहनचालकाचा मृत्यू झाल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. तर काही दुचाकी मॉडीफाय करून चालविण्याचे प्रकार तरुणाईमध्ये वाढू लागले आहे. अनेक दुचाकी चालक कंपनीने दिलेल्या सायलेन्सरमध्ये बदल करून त्यातून जास्त आवाज येणारे सायलेन्सर बसवून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम करतात. याशिवाय काही वाहनचालक विना सीट बेल्ट, विना परवाना, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, भरधाव वेगाने वाहने चालविणे, ट्रिपलसीट, वाहने चालविताना मोबाईलचा वापर, सिग्नल तोडणे, विना नंबर प्लेट अशा विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्या विरोधात वसई विरार, मीरा भाईंदर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्षभरात १ लाख २८ हजार १४१ इतक्या जणांवर कारवाई केली आहे. यात ३ लाख ४६ हजार १७० इतके चलन काढून ११ कोटी ४६ लाख ७२ हजार १०० इतका दंड आकारला आहे. यातील ३ कोटी ९७ लाख ८६ हजार ५५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तर ७ कोटी ४८ लाख ८५ हजार ५५० इतकी रक्कम प्रलंबित राहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काहीजण कारवाई वर कारवाई होऊन सुद्धा दंडाची रक्कम भरत नाहीत. त्यामुळे वाहतूक विभागाचा कोटय़वधी रुपयांचा दंड थकीत राहिला आहे. वर्षभरात जवळपास दोन लाखाहून अधिक चलनाचा सुमारे साडे सात कोटी रुपये इतका दंड थकीत राहिला आहे. दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांनी आता न्यायालयात धाव घेऊन वाहनधारकांना नोटिसा पाठवून दंड भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे महा ट्रॅफिक अॅप ही वाहनधारकांनी डाउनलोड करून आपल्या वाहनावर काही दंड असेल तर तो भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.