वसई: वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने ये जा करणाऱ्या नागरिकांची बॅग व त्यांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र अजूनही ही यंत्रणा कार्यान्वित न करण्यात आल्याने महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.विरार पश्चिमेच्या यशवंत नगर मध्ये वसई विरार महापालिकेचे मुख्यालय आहे.  पालिकेचे हे मुख्यालय ७ मजली असून एकूण क्षेत्रफळ ३ लाख चौरस फूट एवढे प्रशस्त आहे. मुख्यालयाच्या इमरातीसाठी २०० कोटीं रुपये तर बांधकामांसाठी ४५ कोटी रुपये खर्च आल्याची या इमारतीत आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांचे सुसज्ज दालन, सभागृह, स्थायी समिती सभागृह, कॅण्टीन, अभ्यागत कक्ष, आहे. या मुख्यालयातील पहिल्या दोन मजल्यावर परिवहन भवन तर ३ ते ७ मजल्यामध्ये मुख्यालय विस्तारले आहे.या मुख्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्ताने येत असतात.

या मुख्यालयात ये जा करणाऱ्या नागरिकांची नोंद राहावी व त्यांच्या सोबत आणलेली बॅग व वस्तू यांची तपासणी व्हावी यासाठी महापालिकेने अत्याधुनिक स्वरूपाची बॅग तपासणी यंत्रणा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच बसविली आहे.

मात्र नवीन मुख्यालय तयार झाल्यापासून ही तपासणी यंत्रणा अद्यापही कार्यान्वित केली नसल्याने धूळ खात पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा कार्यान्वित असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ही यंत्रणा बंद असल्याने एकप्रकारे कार्यालयाची सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यासाठी पालिकेने ही यंत्रणा सुरू करावी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

सतर्कता महत्वाची

नुकताच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला होता. मात्र हा ईमेल अफवा स्वरूपाचा हे तपासात निष्पन्न झाले होते.

परंतु त्यापूर्वी कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्ब शोध पथकासह संपूर्ण यंत्रणेची तारांबळ उडाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आधीपासूनच सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्युत कामे पूर्ण करून कार्यान्वित केले जाईल

महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची व त्यांच्या सोबत असलेल्या तपासणी साठी यंत्र बसविले आहे त्या यंत्रणेत अजूनही विद्युत कामे बाकी आहेत ती पूर्ण करून लवकरच कार्यान्वित केली जाईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यास ये जा करणाऱ्या नागरिकांची माहीती याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बॅग तपासणी करण्यास मोठी मदत होईल असेही महापालिकेने सांगितले.